वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय. काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा राव येथून आमदार होत्या. त्यांचा वारसा जपणारे विद्यमान आमदार रणजित कांबळे हे पाचव्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवणार आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या दिग्गजांचा सुपडासाफ होत असताना रणजित कांबळे यांनी थोड्या मतांच्या फरकाने बाजी मारली आणि जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा टिकवून ठेवला. भाजपसह विरोधकांनी इथ वेळोवेळी विजयाचे प्रयत्न केले. पण, आमदार रणजित कांबळे यांच्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. यावेळी मात्र सध्या काँग्रेसची परिस्थिती पाहता हा गड राखणं रणजीत कांबळे यांच्यासाठी मोठं आव्हान असेल.

देवळी विधानसभा मतदारसंघात देवळी आणि पुलगाव ही दोन मोठी शहरं आहेत. हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील काही भाग मतदारसंघात समाविष्ट केलेला आहे. देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात 1967 मध्ये अपक्ष म्हणून नारायण काळे निवडून आले होते. त्यापूर्वी आणि नंतर काँग्रेस उमेदवाराने सातत्यानं विजय मिळवला. 1990 मध्ये  इथल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला जनता दलाकडून लढताना सरोज काशीकर यांनी खिंडार पाडलं. शेतकरी संघटनेच्या नेत्या असलेल्या सरोज काशीकर यांनी प्रभा राव यांचा पराभव केला होता. हा पराभव त्यावेळी काँग्रेससाठी मोठा धक्का ठरला. त्यानंतर 1995 मध्ये प्रभा राव यांनी पुन्हा विजय मिळवत काँग्रेसचा गड काबीज केला. त्यानंतर मात्र काँग्रेसचा गड कुणालाही भेदता आलेला नाही.

काँग्रेसच्या प्रभा राव यांचे भाचे असलेल्या रणजित कांबळे यांनी रोहणी गावच्या सरपंचपदानंतर थेट 1999 मध्ये आमदार म्हणून निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या भरघोस यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही. कांबळे यांची मतदारसंघावर असलेली पकड, सामाजिक अभ्यास, प्रशासनावरील पकड त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात. कधी विरोधकांतील अंतर्गत गटबाजी आणि आमदार कांबळे यांचं संघटन कौशल्य, निवडणूक लढण्याची युक्ती विरोधकांवर मात करणारी ठरली. मात्र मागील निवडणुकीत कांबळे यांचं घटलेलं मताधिक्य विचार करायला लावणारं आहे.

दुसरीकडे देवळी हे वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांचं गाव आहे. जिल्ह्यात भाजपाची पकड आता वाढली आहे. मोदी लाटेत या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी जागा राखून विजयाची परंपरा कायम राखली असली तरी आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजप खासदाराचा निवासी मतदारसंघ, भाजप जिल्हाध्यक्षही इथलेच असल्यानं ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपकडून उमेदवारीकरिता चांगलीच स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत.

देवळी मतदारसंघात भाजपला यापूर्वी कधीही विजय मिळाला नसल्यानं, या मतदारसंघावर शिवसेनेचीही दावेदारी आहे. शिवसेनेकडून अशोक शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. पण मागील निवडणुकीत पराभवाचं अंतर कमी असल्याने भाजप ही जागा सोडण्याची शक्यता कमी आहे.

शिवसेनेला प्रतिनिधित्व न मिळाल्यास त्याचाही विचार भाजपला करावा लागणार आहे. इथे भाजपकडून एखादा नवा चेहरा दिला जाऊ शकतो. या मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनीही तिकीट मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय.

काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांचा इथे चार टर्मपासून एकछत्री अंमल राहिला आहे. पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी त्यांची डोकेदुखी वाढवणारी आहे.

विधानसभेकरीता संभाव्य उमेदवार

काँग्रेस : रणजित कांबळे (विद्यमान आमदार)

भाजप : जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, (मागील वेळी अवघ्या 900 मताने पराभूत झाले होते, पुन्हा उमेदवारी मागत आहेत.) भाजप माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, वैभव काशीकर (माजी आमदार सरोज काशीकर यांचे चिरंजीव)

शिवसेना : माजी राज्यमंत्री शिवसेना उपनेते अशोक शिंदे, अनंता देशमुख, बाळा शहागडकर

भाजपला देवळीची जागा काबीज करणं तसं सोपं नाहीय. भाजपकडून इतर मतदार संघांप्रमाणे उमेदवारी देताना तेली, कुणबी समीकरणाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. काही जण मात्र जातीपातीच्या पलीकडे जाऊन पक्षाची भूमिका मांडू शकतात. या मतदारसंघात भाजपलाही अंतर्गत गटबाजीचाही धोका संभवतो. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांकडून इथे बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.

आजवरच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवारालाही तिसऱ्या क्रमांकाची मत मिळाली आहेत. बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही निवडणूक निकालावर परिणाम करणारे असतील, असं जाणकारांना वाटतं.


2014 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते


रणजित कांबळे - काँग्रेस - 62533
सुरेश वाघमारे - भाजप - 61590
उमेश म्हैसकर - बसपा - 24973

2019 लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते
रामदास तडस - भाजप - 85300
चारूलता टोकस - काँग्रेस - 68500