नवी दिल्ली: दिल्लीत गेल्या 15 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (AAP) एकहाती असलेले वर्चस्व झुगारुन लावत मोदी-शाहांचा भाजप राजधानीची सत्ता हस्तगत करणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election Results 2025) शनिवारी जाहीर झाला. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर चार तासांमध्ये हाती आलेल्या कलांनुसार, सध्याच्या घडीला भाजप 47 आणि आम आदमी पक्ष 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी 37 हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे हे कल कायम राहिल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. हा भाजपच्यादृष्टीने ऐतिहासिक विजय मानला जात आहे. या विजयामुळे तब्बल 26 वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेत येणार आहे. मात्र, भाजपच्या या विजयी घौडदोडीबद्दल आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी काही गंभीर आक्षेप उपस्थित केले.
धनंजय शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या तीन घटनांचा उल्लेख केला. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात देण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारचे कौतुक करण्यात आले होते. हा अनफेअर गेम आहे, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.
याशिवाय, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सीतारामन यांनी 12 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली होती. निम्नमध्यमवर्गीय आणि सामान्य नोकदारांच्यादृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. याचा प्रभाव दिल्लीतील मध्यमवर्गीय मतदारांवर पडल्याचा आरोप 'आप'चे नेते धनंजय शिंदे यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहीस्नान करण्यासाठी प्रयागराज गाठले. याठिकाणी मोदींनी संगमावर शाहीस्नान केले. दिल्ली विधानसभेचे मतदान सुरु असताना पंतप्रधान मोदी यांच्या शाहीस्नानाचे लाईव्ह प्रक्षेपण देशभरात सुरु होते. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी मतदान सुरु असताना धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव खेळला, असा आरोप धनंजय शिंदे यांनी केला.
आणखी वाचा