नवी दिल्ली: एकीकडे भाजप आणि शिवसेनेत युती होणार का? कुणाला किती जागा मिळणार? यावरून खल सुरू असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीनं प्रत्येकी १२५ जागा आणि घटक पक्षांना ३८ जागा जाहीर करून आघाडी घेतली. त्यातच आता काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी येत्या २० तारखेला जाहीर होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत दिली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीनं निवडणूक लढवण्याबाबतीत जोरदार वातावरण निर्मिती केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कॉंग्रेसच्या छाननी समितीची चौथी बैठक आज दिल्लीत पार पडली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.


शिवसेना आणि भाजपमधल्या जोरदार इन्कमिंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड पडलं असलं तरी आघाडीनं हार मानलेली नाही. शिवसेना-भाजपच्या अनेक हायप्रोफाईल मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे, असंही थोरात यावेळी म्हणाले.

राहुल गांधी प्रचारासाठी येणार का?


राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जात आहे. राहुल गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कामकाजापासून काहीसे अलिप्त आहेत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रचारात ते किती अग्रेसर असणार याची उत्सुकता आहे. त्याबाबत विचारलं असता थोरात म्हणाले की, राहुल गांधींचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाही, पण आम्ही त्यांना, सोनिया गांधींना आणि प्रियांका गांधी यांनाही प्रचारासाठी विनंती केलेली आहे. वरून जसा आदेश येईल तसा कार्यक्रम निश्चित होईल.



काँग्रेसचे कोणकोणते दिग्गज लढणार नाहीत?


दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेसाठी दिग्गजांनी मैदानात उतरावं असा हायकमांडचा आदेश असला तरीही अनेक नेते मैदानात उतरण्यास उत्सुक नाहीत. प्रत्येकाची काही वेगवेगळी कारणं आहेत. नुकतेच खासदारकीची निवडणूक हरलेले मिलिंद देवरा, मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार राजीव सातव , युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे निवडणूक लढवणार नाहीत.



फडणीवसांविरोधात 'सरप्राईज' उमेदवार!


विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातला उमेदवार तुम्हाला सरप्राईज देणारा असेल, असंही थोरात यांनी विशेषत्वानं नमूद केलं.