नवी दिल्ली : एकमेकांवर सडकून टीका करणारे विरोधक कधी गळ्यात गळे घालून हातमिळवणी करतील याचा नेम नाही. भारतीय राजकारणातील हीच जादू लवकरच राजधानी दिल्ली पाहता येण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल एकत्र येण्याचे संकेत आहेत.


आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आप युती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा असून आप आणि काँग्रेस प्रत्येकी तीन जागा लढण्याची चिन्हं आहेत. सातव्या जागेवर शत्रुघ्न सिन्हा उमेदवारी लढवण्याचे संकेत आहेत.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस-आपचा सुपडासाफ झाला होता. सातही जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

काँग्रेसच्या मागे लागून थकलो, पण आघाडीसाठी त्यांच्याकडून कोणताही संपर्क होत नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवसांपूर्वी जाहीर म्हणाले होते.

शुक्रवारी मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 'हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत' असं सांगितलं होतं. त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.