Kasai-Dodamarg Nagar Panchayat: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसई - दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपने एकहाती विजय मिळवला. हा विजय मिळवल्यानंतर विजयाच्या श्रेयवादासाठी दोडामार्ग भाजप तालुका पदाधिकाऱ्याची दोन गटांतील अंतर्गतवाद इतका विकोपाला गेला आहे की चक्क वरिष्ठांच्या आदेशाला तिलांजली देण्याचे काम दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपाला जे निर्विवाद वर्चस्व मिळाले, त्याचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही गटाकडून श्रेयवाद चालू आहे. त्यामुळं दोडामार्ग मधील भाजपाच्या दोन गटांत वाद पहायला मिळत आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या दोन गटातील वादाला मिटवून एकत्रितपणे काम करायला सांगितले. त्यानंतर हा वाद मिटवून एकत्रितपणे भाजपच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम केलं. त्याचा परिणाम कसई दोडामार्ग नगरपंचायत एकहाती सत्ता भाजपकडे आली. मात्र नगरपंचायत मध्ये मिळालेल्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेली दिलजमाई व्यर्थ गेली आहे. भाजप समोर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसने तगडे आव्हान उभे केले होते. हे आव्हान भाजपाने पेलले व प्रतिस्पर्धी तिन्ही राजकीय पक्षांना धूळ चारत कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविला. याचे श्रेय भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आहे. मात्र, आता दोडामार्ग भाजप तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते या श्रेयात फक्त आपलाच वाटा असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे दोन्ही गटात वाद पहायला मिळत आहे.


दोडामार्ग मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप मधील या दोन गटांची दिलजमाई केली. मात्र त्यानंतरही या दोन्ही गटातील अंतर्गत वाद वारंवार उफाळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही गटातील हे वाद चक्क पोलीस ठाण्यातही गेले होते. मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार ते आपापसात सामंजस्याने मिटविले. दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्य वाद उफाळून येत आहेत. वरिष्ठांनी कितीही कानपिचक्या दिल्या, तरी मी पणावर ठाम असलेल्या या कार्यकत्यांनी आमच्यात कधीच दिलजमाई होणार नसल्याचे अनेक उदाहरणे वारंवार दाखवून देत आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेली दिलजमाई व्यर्थ गेली की काय? अशी चर्चा दोडामार्गात रंगू लागली आहे.


अंतर्गत वादामुळे अनेकदा त्या पक्षाचे नुकसान होते. हे वाद असेच सुरू राहिल्यास भविष्यात दोडामार्ग मध्ये भाजपला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेते हे वाद शमविण्यात यशस्वी होतील का? तसेच वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन हे पदाधिकारी व कार्यकर्ते करतील का? अशा उलटसुलट चर्चा दोडामार्गात सध्या सुरू आहेत. 


दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपने आपलं वर्चस्व प्रस्तापीत केलं असलं तरी विजयानंतर आता दोन गटातील वाद हा नगराध्यक्षपद कोणत्या गटाला मिळणार इथपर्यंत गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही गटात कुरघोडी करणे सुरू झालं आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी समजवून देखील दोडामार्ग तालुका भाजपच्या दोन गटातील वाद मिटेना झाला आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha