मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शिवतीर्थावरुन भाजपवर केलेल्या शरसंधाणावर खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीडियात टिकून राहण्यासाठी राज ठाकरेंना अशी भाषणं करावी लागत आहेत. तसेच राज ठाकरेंच्या भाषणामुळे मतदारांची करमणूक होत असल्याचा टोला गोपाळ शेट्टी यांनी लगावला.


राज ठाकरेंना मीडियामध्ये राहायचं असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करावीच लागणार. मोदींवर बोलले नाही तर मीडिया त्यांच्याकडे जाणारही नाही. मला राज ठाकरेंबद्दल किव येते, ज्या काँग्रेसने त्यांना सोबत घेण्यास नकार दिला, त्यांच्या प्रचारासाठी आज त्यांना मैदानात उतरावं लागत आहे, अशी टीका गोपाळ शेट्टी यांनी केली.



राज ठाकरे आज भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पाडा असं सांगत आहेत. मात्र राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीत पाठिंबा देण्याची भूमिका मनसैनिकांना पटलेली नाही. अनेक नाराज मनसैनिक आम्हाला भेटत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ते इच्छुक आहेत, असा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला आहे.

मतदार आता हुशार, परिपक्व झाले आहेत. भाषण ऐकूण मतदार आपलं मत बनवत नाहीत. मतदारांना स्वत:च्या मताचं मुल्य कळलं आहे. लोक करमणुकीसाठी भाषण ऐकायला जातात. त्यामुळे जे लोक भाषण ऐकायला येतात ते आपल्यालाच मतदान करतील असं कुणीही गृहीत धरु नये, असं गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं.