मुंबई : महाराष्ट्रमध्ये निवडणुका जाहीर होताच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे युतीची चर्चा करत असताना नव महाराष्ट्र नऊ संकल्प असा अभियान हाती घेतला आहे. त्यासोबतच तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉफी विथ लीडर या अभियानाला देखील सुरुवात भाजपने केली आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षात केलेल्या कामांना घराघरात पोहोचवणे हा मुख्य उद्देश्य असेल. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्री देखील लोकांच्या घरी जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात चंद्रकांत पाटील यांनी केली.


यावेळी युती संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की युती ही होणारच आणि लवकरच तुम्हाला त्या संदर्भातली बातमी मिळेल. तसेच 75 वर्ष पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना तिकीट दिलं जाणार नाही, असे ते म्हणाले.

अजित पवार यांच्या राजीनाम्यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा आणि सरकारचा काहीच संबंध नाही. जर आमच्या सरकारने असं काही केलं असेल त्यांनी आमच्या विरोधात पीआयएल दाखल करा असं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

या प्रकरणी  एका व्यक्तीने जनहित याचिका टाकली आणि कोर्टाने या संदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण काँग्रेसच्या काळातलं आहे. तसेच पवार कुटुंबात शांती असू दे, यासाठी मी कोल्हापूरच्या अंबाबाईला प्रार्थना करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपचे हे नऊ संकल्प असणार आहेत
1) युवकांना स्थायी रोजगार
2) दुष्काळमुक्ती
3) प्रत्येक नागरिकाला सर्व अधिकार
4) शेवटच्या व्यक्तीचा विकास
5) सशक्त महिला
6) बळीराजाची समृद्धी
7) प्राथमिक आरोग्य/उपचार
8) पारदर्शक आणि स्वच्छ कारभार
9) महाराष्ट्रच वैभव