पालघर : पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'ला सोडली आहे. 'बविआ'कडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'बविआ'मधील उमेदवारीचा घोळ अखेर शेवटच्या दिवशी मिटला.
पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच सोमवार 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. माजी खासदार बळीराम जाधव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
बहुजन विकास आघाडीकडून तिघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत बहुजन विकास आघाडीकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
विशेष म्हणजे ज्या 'शिट्टी' या निवडणूक चिन्हावर बविआ निवडणूक लढवत आली आहे, तेही पक्षाच्या हातून निसटलं. शिट्टी, रिक्षा आणि अंगठीपैकी एका निवडणूक चिन्हाची निवड केली जाणार आहे.
यावेळी पालघर पंचायत समिती जवळून मिरवणुकीला सुरुवात करुन जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. तारपा नृत्य, आदिवासी नृत्य करत ही मिरवणूक काढण्यात आली.
पालघरमधून शिवसेनेच्या तिकीटावर राजेंद्र गावित निवडणूक लढवणार आहेत. गेल्यावेळी पालघरमधील पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेल्या गावित यांनी यावेळी उमेदवारीसाठी शिवबंधन हाती बांधलं.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालघरमधून 'बविआ'चा उमेदवार जाहीर
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
09 Apr 2019 02:14 PM (IST)
माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीबाबत बहुजन विकास आघाडीकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -