अल्पेश ठाकोरांनी काँग्रेस सोडली अन् हरले उदयनराजेंचही तेच झाले
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2019 11:36 PM (IST)
अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव झाला. तशीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली आहे. उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काही मोठ्या नेत्यांच्या पराभवाच्या चर्चा सध्या सुरू आहे. यापूर्वी गुजरतमधील नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांचा पराभव झाला. तशीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली आहे. उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अल्पेश ठाकोरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटावर अल्पेश ठाकोर आमदारही झाला होते. मात्र त्या निवडणुकीनंतर काँग्रेसने ठाकोर समाजाची एकही मागणी पूर्ण केली नाही. गुजरातमध्ये बिहारी मजुरांसोबत झालेल्या हिंसाचाराचा ठपका अल्पेश ठाकोर आणि त्याच्या समाजावर लावण्यात आला. यामुळं अखेर अल्पेशनं काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घडाळ्याची साथ सोडत हाती कमळ घेण्याचा निर्णय घेतला होता. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने साताऱ्यातील जनतेने उदयनराजे भोसले यांचा पराभव केला असून भाजपसाठी आणि उदयनराजेंसाठी मोठा धक्का आहे. साताऱ्यात उदयनराजेंची लोकप्रियता तुफान आहे. ते कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढले तरी त्यांचा विजय निश्चित असतोच, असं कायम म्हटलं जातं. परंतु हा समज पोटनिवडणुकीत चुकीचा ठरला आहे.