Maharashtra News : सध्या राज्य सरकारचा शिक्षकांवर (Maharashtra Government) अविश्वास आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे, सरकारनं काढलेलं 'आपले गुरुजी' परिपत्रक. या परिपत्रकातून शिक्षकांचा फोटो
वर्गात लावण्याची सूचना सरकारनं दिली आहे. शिक्षण खात्याच्या याच परिपत्रकावर शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, या परिपत्रकासंदर्भात शिक्षकांनी संतापाचा सूर आळवला आहे. शिक्षकांवर अविश्वास दाखवणं कितपत योग्य आहे, असा सवालही शिक्षक संघटनांकडून सरकारला विचारला जात आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टद्वारे एक परिपत्रक शेअर केलं आहे. यापरिपत्रकानुसार सरकारकडून वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फेसबुक पोस्टमध्ये हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, "यापूर्वीही यावर मी पोस्ट लिहिली होती. आता तो आदेश आला आहे. काही शिक्षक त्यांच्या जागी दुसरे शिक्षक नेमतात आणि स्वतः पगार घेऊन बाहेर फिरतात. विद्यार्थ्यांना आपले खरे शिक्षक कोणते आणि बनावट कोणते हे समजावं म्हणून मूळ शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे आदेश दिले गेले आहेत. हे हास्यास्पद आणि संतापजनक आहे. फारतर अर्धा टक्के, असे प्रकार होत असताना सगळ्या शिक्षकांना वेठीला धरणं आक्षेपार्ह आहे आणि समजा मुलांनी फोटोपेक्षा वेगळे शिक्षक ओळखले, तर ती लहान मुलं काय करणार आहेत? पोलीस स्टेशनला जाणार आहेत का? शिक्षण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पाहणी करणारी यंत्रणा असताना,  असे शिक्षक नेमले जातात आणि त्यांना पकडून देण्याचं काम त्या लहान मुलांनी करायचं आहे. एसटी स्टँडवर चोरांचे आणि वर्गात सरांचे फोटो लावायचे आहेत. लहान मुलांना भ्रष्टाचार पकडून देण्याचं प्रशिक्षण देणारं शासन नक्कीच थोर आणि दूरदृष्टीचं आहे." 



सरकारकडून काढण्यात आलेल्या 'आपले गुरुजी' परिपत्रकाबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी म्हटलं की, शिक्षण खात्यानं आपल्या गुरुजी परिपत्रकाच्या माध्यमातून शिक्षकांचा सन्मान नाही, तर अवमान केला आहे. सदर परिपत्रक लवकरच मागे घ्या, अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसचे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा परिपत्रकाला तीव्र विरोध आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. 


दरम्यान, सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानंतर शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. या परिपत्रकावर शिक्षकांनीही आक्षेप नोंदवला आहे. परिपत्रक मागे घ्या नाहीतर आंदोलन करु असा इशाराही शिक्षण संघटनांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI