SSC Results 2020 Stats |पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल तब्बल 95.30 टक्के एवढा लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तर मागच्या वर्षाच्या (मार्च 2019) तुलनेत यंदाचा (मार्च 2020) निकाल 18.20 टक्क्यांनी जास्त आहे.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल एक वाजता पाहू शकतील.
मागच्या वर्षापेक्षा यावर्षी निकाल खूप जास्त लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. तर यंदाचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालाची टक्केवारी वाढण्याचं कारणही शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितलं. "अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा, कृती पत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं शकुंतला काळे म्हणाल्या.
निकालाचे ठळक मुद्दे
- राज्यात 242 विद्यार्थांना 100 टक्के गुण
- मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल
- 22570 पैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के
भूगोलाचा पेपर रद्द आणि गुणांची सरासरी
यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्यात आला. तर 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला.
कोकण विभाग अव्वल
सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे.
पुणे - 97.34 टक्के
नागपूर - 93.84 टक्के
औरंगाबाद - 92 टक्के
मुंबई - 96.72 टक्के
कोल्हापूर - 97.64 टक्के
अमरावती - 95.14 टक्के
नाशिक - 93.73 टक्के
लातूर - 93.09 टक्के
कोकण - 98.77 टक्के
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 96.91 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 93.90 टक्के आहे. म्हणजे मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त आहे.
संबंधित बातम्या
MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल
Maharashtra SSC Results 2020 | दहावी बोर्डाचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI