HSC SSC Result 2022 : "दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाईल," अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.


शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डाने म्हटलं. त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.


यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. याअंतर्गत बहुतांश परीक्षांची पहिली शिफ्ट सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत सुरु होती. तर दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी 3 ते 6.30 अशी होती. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.


तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या. राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.


विद्यार्थी आणि पालकांची चिंता मिटली
खरंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाचे विषयावार पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का असाही सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. परंत आता जून महिन्यात निकाल लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे.


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं होतं? 

परंतु दहावीची आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील, मार्चमध्ये एक मिटिंग झाली. पुढच्या आठवड्यातही एक मीटिंग होणार आहे. साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतातय यावर्षी ही निकाल वेळेत लागतील, असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्या अहमदनगरमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात बोलत होत्या.

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI