मुंबई : एका 29 वर्षीय व्यक्तीने छेड काढल्याचे मुलीने आपल्या मित्राला सांगितले. त्यावर मित्राने आपल्या इतर मित्रांना घेऊन छेड काढलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. ही मारहाण जिव्हारी लागल्याने त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पाच तरुणांना रविवारी अटक करण्यात आली आहे. हे पाचही तरुण कॉलेजमध्ये शिकणारे आहेत.


ही घटना गुरुवारी रात्रीची आहे. सदर मुलगी आपल्या घरी जात असताना मृत मयुर गिरधारी जोशी यांनी त्या मुलीवर काही टिप्पणी केली. या आधी देखील असं कृत्य मयुर जोशीकडून (वय 29) करण्यात आला होतं, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली. या गोष्टीला कंटाळून मुलीने तिचा मित्र मानस मोरे (वय 19) याला फोन करुन सांगितली.


शहापूरमधील तीन तरुणांच्या मृत्यूचं गूढ वाढलं; 'त्या' झाडाला अडकवलेला साडीचा चौथा फास कोणासाठी?


मानसने फोन करून आपल्या इतर मित्रांना बोलवून मयुर जोशी याला मारहाण सुरू केली. मयुर जोशी जमिनीवर पडल्यानंतर सर्व मुलांनी घटनास्थळावरून पळ काढला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मयुर जोशीच्या पोटात अतिशय वेदना होत होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


यानंतर पोलिसांनी त्या परिसरात लागलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. एका दुकानाबाहेर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये मयुर जोशीला झालेली मारहाण कैद झाली होती. त्याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या सर्व तरुणांना अटक केली आहे. ही सर्व मुलं कॉलेजमध्ये शिकणारी असून राजीव नगर दत्त मंदिर रोड सांताक्रुज ईस्ट परिसरात राहणारी आहेत.


प्रवासात ओळख वाढवून अपहरण केलेल्या चार महिन्यांच्या बाळासह महिलेला अटक


वाकोला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या पाचही मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर करून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.