शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चांदे या गावाच्या हद्दीतील एका झाडावर तीन तरुणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये एका गुराख्याने पाहिले होते. ही आत्महत्या आहे की यांचे खून करून यांना या झाडाला लटकवलं आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर खर्डी पोलिसांनी तिनही मृतदेह झाडावरून खाली उतरवल्यानंतर त्याच झाडावर एका गुलाबी साडीने चौथा फास तयार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यामुळे पोलिस आणि स्थानिक नागरिक चक्रावून गेले आहेत. या तिनही मृतदेहांसोबत आणखी चौथा फास कोणत्या व्यक्तिसाठी होता आणि हा फास कोणी तयार केलाय? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण प्रकरणा संदर्भात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.


शहापूर तालुक्यातील चांदे गावाच्या माळरानातील एका घनदाट झाडांवर 20 तारखेला तीन तरुणांचे मृतदेह लटकत असल्याचे दृश्य येथील गुराख्याने पाहिले होते. एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. या झाडाला याच परिसरातील नितीन भेरे , महेंद्र दुबेले, मुकेश घावट या तिघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले होते.


14 तारखेला अमावस्या होती. या रात्री दहा वाजता महेंद्र आणि मुकेश यांना बोलवण्यासाठी सचिन नावाचा एक व्यक्ती त्यांच्या घराच्या दारात आला होता. महेंद्र आणि मुकेश हे मामा-भाचे आहेत. रात्री या तिघांमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि लगेच रात्रीच्या अंधारात हे तिघेही त्या परिसरातून निघून गेले. त्या दिवसापासून मुकेश, महेंद्र आणि नितीन हे तिघेही बेपत्ता होते. नितीन भेरे हा तंत्रमंत्र विद्येचा वापर करत होता. त्याच्या घरामध्ये कालीमातेचे छोटे मंदिर आहे. आणि तो शिवभक्तही आहे. गाभाऱ्यात अनेक तंत्र-मंत्र विद्येची पुस्तकं, त्रिशूल, चाबुक यासह अनेक गोष्टी आढळून आलेल्या आहेत.


नितीन हा लोकांचे विविध प्रश्न देवा-धर्माच्या नावाखाली सोडवत असे अशी चर्चा या गावात आहे. मोक्ष प्राप्तीसाठी किंवा पैशांचा पाऊस पाडण्यासाठी किंवा अनेक धार्मिक कारणासाठी या तिघांचा बळी दिलाय का? असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. स्थानिक पोलिसांनी या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र या तिघांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून त्यांचे खून करून त्यांना कोणीतरी झाडावर लटकलेला आहे. असा आरोप केलेला आहे. नितीनला काळी जादू आणि तंत्र मंत्र विद्या अवगत होती. त्यामुळे पोलिसांनी या तिघांची आत्महत्या आहे की खून आहे, की तंत्रमंत्र विद्येच्या नादाला लागून पैशांचा पाऊस, मोक्षप्राप्ती किंवा विद्येसाठी त्यांचा कोणीतरी बळी दिला आहे का? या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नितीनकडे असलेल्या मोबाईलमध्ये ज्या बाबांचा नंबर आहे त्यांच्याकडे पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे.


दरम्यान, चांदे गाव परिसरातील ज्या झाडाला हे तीन मृतदेह लटकले होते. त्याच झाडाला गुलाबी साडीतील चौथा फास अडकवण्यात आला होता. हा फास कोणासाठी आणि कोणी तयार केला आहे? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :