Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. यानंतर आता या प्रकरणात पाच जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) एकाला ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की,  मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. 


इतर आरोपींचा शोध सुरु 


छेडछाड प्रकरणी सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या. टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली. टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. टवाळखोर व छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 


एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया


या प्रकरणावर रक्षा खडसे यांच्या सासरे एकनाथ खडसे एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी अशा अनेक घटना या परिसरात घडलेल्या आहेत. परंतु, मुली पोलीस स्टेशनला यायला घाबरतात. मी माझ्या नातीला सांगितलं की, तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण घाबरता कामा नये. रक्षाताई देखील या संदर्भात पोलिसांशी बोलल्या आहेत. मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवले होते. पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. इतके गुंड याठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण आहे, असे त्यांनी म्हटले.  



आणखी वाचा 


Rohini Khadse : महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या