ठाणे : रेल्वे प्रवासात एका वृद्ध व्यक्तीला बीफ बाळगल्याचा संशयावरुन काही तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्वटिट करुन घटनेची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर, पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना अटकही केली. मात्र, काही तांसातच त्यांचा जामीन झाल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत चर्चा केली. याप्रकरणातील आरोपींना एवढ्या लवकर जामीन कसा मिळाला, असा सवालही विचारला आहे. तसेच, सोशल मीडियावर पोस्ट लिहून संबंधित व्यक्तीचा व्हिड़िओही शेअर केला आहे. सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचे कुठल्याही प्रकारे पालन न करता रेल्वे पोलिसांनी अतिशय सौम्य कलम लावली आणि गुन्हेगारांना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा इतका गंभीर असून देखील त्याच्या गांभीर्याकडे आणि त्याच्या उमटलेल्या पडसादाची पोलिसांनी जाणीव ठेवली नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलं.  


रेल्वे (Railway) प्रवासात मारहाण झालेल्या या घटनेत त्या वृद्ध इसमाची दृष्टी कमी झाली असून त्याला लघवीला होत नाही, त्याच्या खिशातील 2 हजार 800 रुपये लुटले गेले आहेत. त्याला खुनाची धमकी देण्यात आली, हे सगळं होत असताना त्याची नोंद न करता  कोणती तरी सौम्य कलमे लावून आता त्या गुंडांचा जामीनही झाला आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली. पोलिसांवर (Police) लोकांचा विश्वास कसा राहील आणि यामुळेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळते, कारण पोलिसांचा धाकच उरलेला नाही. असं जर होत असेल तर जनता रस्त्यावर उतरली तर लोकांची चूक काय? जर रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गुन्हा लोकांवरच नोंदवणार. आजची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेली घटना आहे, इतकी विकृत घटना असतानादेखील जर पोलीस त्याचे गांभीर्य ओळखत नसतील तर हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. दिवसें दिवस कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळवण्यास पोलीस कारणीभूत ठरत आहेत, असे म्हणत आव्हाड यांनी संबंधित प्रकरणात आरोपींवर कोणती कलमे लावायला पाहिजे होती, हेही सांगितलं आहे.  126 (1), 127 (1), 118(1), 309(6), 189 (4), 189(3), 191(1), 191(2),191(3) BNS पोलिसांनी ही कलम लावायला हवी होती, असे आव्हाड यांनी म्हटले. 


काय आहे प्रकार


मुंबईहून धुळे-सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये 28 ऑगस्टला हा प्रकार घडला. जळगावमध्ये राहणारा वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणकडे जायला निघाला होता. नाशिक रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर वृद्धाचा बसण्याच्या जागेवरून तरूणांशी वाद झाला होता. या तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला, त्याचवेळी त्याच्या सामानाची तपासणी केली. तसेच, आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर तरूणांनी वृद्धाला मारहाण केली. यावेळी काही तरूणांनी या घटनेचे व्हिडीओ शेअर केला, आता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं. 


पोलिसांनी तिघांनी घेतलं ताब्यात


विशेष म्हणजे हे तिघेजण मुंबईला पोलीस भरतीसाठी जात होते. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी (Railway Police) या घटनेची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणात रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवेंच्या आदेशानंतर सदर पीडित व्यक्तीला पोलिसांनी शोधलं. हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव आहे. हाजी अशरफ अली हे मुळचे चाळीसगावचे राहणारे असून 28 ऑगस्टला ते कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी येत होते. कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्यांना मारहाण केली. अशरफ अली यांना कल्याण रेल्वे स्थानकात या तरुणांनी उतरू दिले नाही. नंतर त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले. आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी तिघांची नावे आहेत. अटक केलेले तिघे तरुण हे मूळचे धुळ्याचे आहेत, त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आता जामीन मंजूर झाला आहे.


काय म्हणाले अजित पवार


इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान एका वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आल्याची घटना समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आज मी संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, आणि अशा असामाजिक घटकांना आमच्या महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही, असे ट्विट अजित पवार यांनी केले होते. 


हेही वाचा


'क्वालिटी' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदार चर्चेत; कोण आहेत सोफिया फिरादौस