भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून  हत्या केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. त्यानंतर पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने त्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून घरातील दागिने गहाण ठेवून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. 


प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे हत्या झालेल्या ओला कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी फिर्यादी (32 रा. कणेरी), प्रियकर नितेश गोवर्धन वाला (वय 28, रा. भादवड), मैत्रीण प्रिया सुहास निकम (वय 32 रा. वेताळपाडा) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे सुपारी किलर फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करीत आहेत.


पतीची हत्या करण्यासाठी रचला कट
मृत प्रभाकर आणि पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक वैवाहिक संबंध असून त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेश यासोबत विवाह करण्यासाठी आपल्या पतीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. परंतु, पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली. प्रियाही आपल्या पतीला सोडून वेगळी राहत असल्याने तिने पतीची हत्या करुन काटा काढण्याचा सल्ला दिला असता त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले असता पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली आणि त्यानंतर पत्नी श्रुती, प्रियकर नितेश, मैत्रीण प्रिया यांनी कट रचून हत्या करणाऱ्यांनी 31 ऑगस्टच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल करून ओला कार बुक केली. त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या करून मृतदेह कारमध्येच ठेवून पसार झाले होते. 


या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित तपास करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे ठाणे मुख्य गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात पत्नी श्रुती, प्रियकर नितेश आणि मैत्रीण यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हत्या करणारे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या संपूर्ण घटनेचा तपास नारपोली पोलीस करीत आहे. परंतु, या संपूर्ण प्रकारामुळे पत्नी श्रुतीचे दोन मुलं आणि मैत्रीन प्रियाचे दोन मुलं असे चारही मुलं निराधार झालेत.