मुंबई: भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सीबीआयने (CBI) छडा लावला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘कृष’ याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सुनील हा म्यानमारमधील कुख्यात सायबर फसवणूक केंद्रांमध्ये भारतीयांना गुलाम म्हणून विकण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर आहे. तिथे त्यांना जबरदस्तीने “डिजिटल अरेस्ट”, रोमांस फ्रॉड आणि क्रिप्टो फसवणूक करण्यात लावले जात होते. पीडितांना कैदेत ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
काय आहे हे 'नोकरी' रॅकेट?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट भारतातील सुशिक्षित तरुणांना थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवायचे. पीडितांना आधी दिल्ली आणि तिथून बँकॉकमार्गे विमानाने नेले जायचे. मात्र, थायलंडला पोहोचल्यानंतर त्यांना रस्तेमार्गे गुपचूप म्यानमारमधील 'म्यावाडी' (विशेषतः KK पार्क) परिसरातील सायबर गुन्हेगारी केंद्रांमध्ये नेले जात होते.
कैदेत ठेवून 'डिजिटल अरेस्ट' आणि छळ
म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर या तरुणांना अक्षरशः कैदेत ठेवले जायचे. तिथे त्यांना खालील गुन्हे करण्यासाठी जबरदस्ती केली जायची, भारतातील लोकांना फोन करून पोलीस असल्याचे भासवून लुटणे. सोशल मीडियावरून प्रेमाचे नाटक करून फसवणूक करणे. गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांचे पैसे लाटणे. या कामाला नकार देणाऱ्या पीडितांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे.
२०२५ मध्ये सुटका आणि तपासाला गती
या नरकातून २०२५ मध्ये काही पीडितांनी जिवावर उदार होऊन पळ काढला. थायलंडमार्गे भारतात परतल्यानंतर त्यांनी आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून सीबीआयने तपासचक्र फिरवले आणि सुनील उर्फ कृष याची या प्रकरणातील मुख्य भूमिका उघडकीस आणली.
मुंबईतून अटक आणि पुरावे जप्त
सुनील कृष हा नुकताच मुंबईत परतल्याची माहिती मिळताच सीबीआयने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून या रॅकेटमध्ये आणखी किती मोठे मासे अडकले आहेत, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध CBI घेत आहे.
"मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सीबीआयने या बेकायदेशीर कृत्यांमागील मुख्य सूत्रधारांची ओळख पटवण्यासाठी अत्यंत सखोल आणि बारकाईने तपास केला. या मानवी तस्करीच्या जाळ्यात 'कृष' हा एक प्रमुख दलाल आणि किंगपिन (मुख्य सूत्रधार) म्हणून समोर आला आहे. दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये पीडितांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांचे शोषण करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या आरोपीच्या हालचालींवर सीबीआयची सतत नजर होती. तो नुकताच भारतात परतल्यानंतर सीबीआयने त्याला मुंबईतून अटक केली आहे."
कृषच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली असून, तिथे म्यानमार आणि कंबोडियामधील मानवी तस्करीच्या ऑपरेशन्सशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत."या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या जाळ्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा आणि विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी तसेच या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, याचा उलगडा करण्यासाठी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे," असे यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
