Man Has Six Wifes : अनेक वेळा एका व्यक्तीच्या दोन किंवा तीन बायका असल्याचं ऐकण्यात येतं. तुम्ही बॉलिवूडचा 'किस किसको प्यार करु' चित्रपटही पाहिला असेल, यामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या तीन बायका असतात. पण आम्ही तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहोत जी ऐकून तुम्हीही चकित व्हाल. याचं कारण म्हणजे या व्यक्तीने एक किंवा दोन नाही तर चक्क सहा बायका केल्या आहेत. हो या पठ्ठ्याने तब्बल सहा लग्न केली. आंध्र प्रदेशमधील ही बातमी समोर आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे या व्यक्तीच्या सहा बायकांमधील एकही बायको एकमेकांना ओळखत नाहीत.


आंध्र प्रदेशमध्ये एका व्यक्तीने सहा लग्न केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीच्या सहा बायकांपैकी एकही बायको दुसऱ्या बायकोला ओळखत नाही. पोलिसांना तपासादरम्यान या व्यक्तीच्या सहा बायका असल्याचं आढळून आलं. इतकंच नाही तर या व्यक्तीच्या आणखी बायका असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 


एका बायकोने केली होती तक्रार


या आरोपीविरोधात एका पत्नीने 33 वर्षीय पतीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) तपास सुरु केला. या तपासावेळी या व्यक्तीनं सहा लग्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. हैदराबाद पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीच्या आणखी बायका असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


कोण आहे सहा बायका असणारा व्यक्ती?


आंध्र प्रदेशमधील मंगलगिरी येथील निवासी अदापा शिवशंकर बाबू असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या आरोपीवर फसवणूक, विश्वासघात आणि लपवून एकापेक्षा जास्त लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत सांगितलं आहे की, या आरोपीवर गेल्या चार वर्षांपासून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे अशा तक्रारींची नोंद आहे.


आरोपीनं बायकांना असं फसवलं


पोलिसांना तपासात आढळलं की, आरोपीने विवाह संस्थांच्या वेबसाईटवर घटस्फोटीत बायकांना लक्ष केलं. त्याने स्वत: सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचं सांगितलं. त्याने लग्न करुन बायकांना गंडा घालण्याची योजना आखली. लग्नानंतर बाबून पैसे आणि दागिने घेऊन पळून जायचा. बाबूने एका महिलेशी वेबसाईटवरून संपर्क साधत एका महिलेशी लग्न केलं. लग्नानंतर आरोपी 20 लाख आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला. या प्रकरणी पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर तपासाअंतर्गत या प्रकरणाचा उलगडा झाला. या आरोपीनं आणखी बायकांना लग्न करुन गंडा घातला असल्याचा पोलिसांना संशय आहे.