Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सतत घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच शनिवारी शिये फाटा परिसरात झालेल्या गोळीबाराची धग ओसरायचीही नाही तोच सोमवारी पन्हाळा तालुक्यातील नावली गावात पुन्हा अशीच धक्कादायक घटना घडली. घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिक नीलेश राजाराम मोहिते याने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरच गोळी झाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सोमवारी सकाळी विनोद अशोक पाटील (वय 39) हे गल्लीत पोस्टर लावत असताना त्यांच्यात आणि नीलेश मोहिते यांच्यात जुन्या वादातून वादावादी झाली. काही वेळातच संतापलेल्या नीलेशने घरातून पिस्तूल आणले. प्रथम हवेत गोळी झाडत धाक दाखवला आणि नंतर थेट विनोदच्या मांडीवर गोळी झाडली. अचानक झालेल्या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे गोळी झाडल्यानंतर आरोपी नीलेश यानेच जखमीला उचलून कोडोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. या वागण्यामुळे परिसरात आणखी खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले की, या घटनेमागे 2014 सालच्या एका प्रेमविवाहाचा वाद कारणीभूत आहे. विनोद पाटील यांनी त्यावेळी नीलेशच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मोहिते कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला होता. परिणामी दोन्ही कुटुंबांमध्ये संबंध तणावपूर्ण राहिले. याच रागातून सोमवारी सकाळी घडलेली वादावादी इतकी वाढली की गोळीबारापर्यंत पोहोचली.
घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. त्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पुरावे गोळा केले. आरोपी नीलेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण आहे. चारच दिवसांत दोन वेळा गोळीबार झाल्याने कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चव्हाट्यावर आली आहे. नुकत्याच शिये फाटा येथे किरकोळ वादातून संशयिताने हवेत गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता, मात्र सलग घडणाऱ्या घटनांनी पोलीस यंत्रणेसमोर कठीण आव्हान उभे केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे वातावरण असतानाच अशा गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देत सर्वाधिक संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.