कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या मृत्यूच्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दंतचिकित्सक (Dentist) डॉ. अवधूत मुळे यांनी राजाराम तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीय. प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, डॉ. अवधूत मुळे हे गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद आणि नैराश्याने (Depression) त्रस्त होते. त्यांचा घटस्फोट देखील झाला होता. परिणामी ते गेल्या काही वर्षांपासून प्रॅक्टिसही करत नव्हते. अशातच कौटुंबिक तणावातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज राजारामपुरी पोलिसांनी वर्तवला आहे.
दुसरीकडे आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्रांना पाठवलेला शेवटचा व्हॉट्सॲप मेसेज आणि मृत्यू निश्चित करण्यासाठी केलेली तयारी पाहून पोलिसांसह नागरिकही हादरून गेले आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Kolhapur Crime News : नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय दंतचिकित्सक अवधूत मुळे हे मूळचे जयसिंगपूर येथील रहिवासी होते. शुक्रवारी ते आपल्या दुचाकीवरून कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरात आले. त्यांनी तलावाच्या काठावर आपली गाडी पार्क केली आणि त्यानंतर पाठीवरील सॅकमध्ये दगड आणि विटा भरल्या. वजनामुळे शरीर पाण्यातून वर येऊ नये, यासाठी त्यांनी ही शक्कल लढवल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी तलावात उडी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवलीय.
Kolhapur Crime : "माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल"; शेवटचा धक्कादायक मेसेज
"माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल" अशा अशायाचा एक हृदयद्रावक मेसेज आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. मुळे यांनी आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवला होता. दरम्यान, हा मेसेज वाचून त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांचा शोधाशोध सुरू केला आणि पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. मात्र फार उशिरा राजाराम तलावाच्या काठावर डॉ. मुळे यांची दुचाकी आढळून आली. या दुचाकीवर त्यांनी एक सुसाईड नोट (चिठ्ठी) ठेवली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी तलावात शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी त्यांच्या पाठीवरील बॅगेत दगड भरलेले आढळून आले, ज्यामुळे त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगला नसल्याचे बोललं जात आहे.
हेही वाचा