मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आदेश दिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल (शुक्रवारी, ता २०) रात्री आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याशी निकटचे संबंध भोवले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आणि त्यांना आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतर चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रात्री नऊच्या सुमारास देवगिरी बंगल्यावर भेटल्या. त्यांनीही चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्यास सांगितले. आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा होता. दिवसभराच्या घडलेल्या घडामोडीनंतर रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहलेला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. त्यांचे राजीनामा पत्र सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील व मुख्यमंत्री ते राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवतील, तर या सर्व प्रकरणावर आणि चाकणकरांच्या राजीनाम्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्य म्हटलंय की, "महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे", अशी माहिती त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
राजीनामा देताना चाकणकरांनी नेमकं काय म्हटलंय?
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.
तर राजीनामा पत्रात लिहलंय की, मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.
अशोक खरातबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या, खरातच्या ट्रस्टवरील माझा कार्यभार ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपला आहे. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरू मानले. ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असायचे कारण नव्हते. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या सुरू आहेत.
