चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या महाकाली मंदिर परिसरातील चाकूहल्ला झालेल्या 17 वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  मृत्यूनंतर नातेवाईक व परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.


राज्यात महिलांवरील अत्याचारांची मालिका सुरूच असल्याचं दाखवणारी घटना चंद्रपूर शहरात उघड झाली आहे. चार  दिवसांपूर्वी महाकाली मंदिर परिसरात चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या वनश्री आंबटकर या  17 वर्षीय मुलीचा आज सकाळी मृत्यू झाला. वनश्रीच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक संतप्त असून पोलिसांनी पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.


17 वर्षीय वनश्री आंबटकर हिची गेल्या चार दिवसांपासून मृत्यू सोबत सुरु असलेली झुंज आज अखेर संपली. नागपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये आज सकाळी तिचा मृत्यू झाला.   सप्टेंबरच्या संध्याकाळी वनश्री हॉस्पिटल मधील आपलं काम संपवून घरी जात होती. मात्र तिच्या वाटेत दबा धरून बसलेल्या प्रफुल्ल आत्राम या आरोपीने तिच्या वर चाकूचे सपासप वार केले आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनश्रीचा आज मृत्यू झाला.


या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी एकाच भागात राहणारे असून त्यांची 2019 पासून एकमेकांशी ओळख होती. आरोपीचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होते आणि यातून त्यांच्यात खटके उडायचे. पीडित तरुणी ज्या खाजगी रुग्णालयात काम करायची त्या रुग्णालयात आरोपीने 1 सप्टेंबरला जाऊन त्या मुलीला शिवीगाळ केली होती आणि याबाबत रामनगर पोलीस स्टेशन ला गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. आणि याच रागातून ही तरुणी रुग्णालयातून घरी जात असतांना आरोपीने तिच्यावर चाकूहल्ला केला होता. या घटनेने मुलगी वास्तव्याला असलेल्या बाबूपेठ परिसरात संताप व्यक्त होत आहे. 1 सप्टेंबरला करण्यात आलेल्या तक्रारीवर पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असा आरोप करण्यात आलाय.  पोलिसांनी 1 सप्टेंबरला केलेल्या तक्रारीची योग्य दखल घेतली नाही असा जो आरोप नातलगांनी केलाय त्यावर पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय.


एकतर्फी प्रेमामुळे झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण चंद्रपूर शहर हादरलंय. कुठलाही गुन्हा होण्याआधी चाहूल देतं. मात्र चंद्रपूर पोलिसांनी दाखवलेल्या अक्षम्य हलगर्जीपणा मुळे एका 17 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागलाय. या चुकीबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई होणार का हे पाहणं त्यामुळे आवश्यक आहे.