Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपुरातील खामला परिसरात असलेल्या कार्यालयात फोन करून खंडणी मागणाऱ्या व धमकी देणाऱ्या जयेश ऊर्फ जपेश कांताशी संबंधित सहा जणांचे जबाब नागपूर पोलिसांनी नोंदवले आहेत. या सहा जणांशी जयेशने हा प्रकार केल्यावर संपर्क केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटकात गेलेले पोलिस (Nagpur Police) पथक परतले आहे. जबाब नोंदवल्यानंतर पोलिस आता या प्रकरणाशी संबंधित विविध पुरावे गोळा करत आहेत.


बेळगाव (कर्नाटक) येथील आरोपी जयेश उर्फ जपेश कांता एस. उर्फ शाकीर उर्फ साहिर याने 14 जानेवारी रोजी गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात फोन केला होता. त्याने खंडणी मागत पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर सेलच्या मदतीने फोन करणाऱ्याचा शोध घेतला. हा कॉल जयेशने बेळगाव कारागृहातून केल्याचे निष्पन्न झाले होते. 


आधी फोन शोधून आणा...


जयेशला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी तातडीने एक पथक बेळगावला रवाना करण्यात आले. जयेशने मोबाईल अगोदरच टॉयलेटमध्ये 'फ्लश' केला होता. अगोदर मोबाईल शोधा असे म्हणत त्याने नागपूर पोलिसांनाच आव्हान दिले होते. तसेच चौकशीत सहकार्य करण्याऐवजी परवानगी घेऊन चौकशी करण्याची भाषादेखील वापरली. जयेशला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्याला आणणे फार कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. 


...तर जयेशला अटक करुन निर्णय घेऊ


जयेशने गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यापूर्वी सहा जणांशी संपर्क साधला होता. सीडीआरवरून याची माहिती मिळताच पोलिसांनी न्यायालयात सर्वांचे जबाब नोंदवले. जयेशने फोन केल्याचे त्यांनी मान्य केले. जयेशविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यासाठी पोलिस इतर तथ्ये देखील गोळा करत आहेत. त्यानंतरच जयेशला अटक करून त्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


फोन कॉल लोकेशननुसार...


पोलिस तपासात आरोपीने धमकी दिलेल्या फोनचं लोकेशन बेळगाव तुरुंगात दिसलं होतं मात्र तीन दिवसांनंतरही पोलिसांना तो फोन हस्तगत करता आला नव्हता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आला होता. बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश कांथा नावाच्या सराईत गुन्हेगाराने हा कॉल केला होता. जयेश कांथा याने काही वर्षांपूर्वी केरळमध्ये जाऊन धर्म परिवर्तन केले असल्याची माहिती मिळाली आहे. जयेश कांथा याने तुरुंगाच्या आत नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून कॉल केल्याचं समोर आले आहे. यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता. शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वीही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे.


ही बातमी देखील वाचा...


Teachers Constituency Election : नागपुरात मतदानासाठी शेवटच्या तासात शिक्षकांची धावाधाव; अनेक 'लेटलतिफ' मतदानापासून वंचित?