बीड : विलास घुले हत्या प्रकरणात (Vilas Ghule Case)  जर आपल्या मुलाचा हात असेल, आरोपींच्या सीडीआरमध्ये कुठेही नाव आलं तर त्याला आपण स्वतः पोलीस ठाण्यात आणून सोडतो, अशी भूमिका बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडली. काही आरोपी त्यांचं सरकार असतानाही पळत होते, पण आम्ही कुठेही गुन्हेगार नाही म्हणून उघड माथ्याने फिरतोय, असंही बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले. केज तालुक्यात 20 जून रोजी विलास घुले या युवकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

विलास घुले खून प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या निर्णयाबाबत शंका व्यक्त केली. विलास घुले प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

Bajrang Sonawane Kaij Case : महासंचालकांच्या भूमिकेवर संशय

खासदार बजरंग सोनवणे यांनी विलास घुले खून प्रकरणावरून थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या एका निर्णयाबाबत बाबत शंका उपस्थित केली आहे. विलास घुले खून प्रकरणात सदानंद दातेंकडे सकाळी अर्ज दिला आणि संध्याकाळी सीआयडीची ऑर्डर आली. इतकं आपलं महाराष्ट्र शासन जलद आहे का? बीड पोलिसांनी दोन दिवस तपास केल्यानंतर एसआयटी नेमली. आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. असं असताना सदानंद दातेंचा बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेवर भरवसा नाही का?

Continues below advertisement

Vilas Ghule Case : तपास सीबीआयकडे द्या, सोनावणेंची मागणी 

विलास घुले प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा. जेवढे आरोपी अटक झालेत तेवढ्या आरोपींच्या सीडीआरमध्ये माझ्या मुलाचं कुठं नाव आलं तर मी त्याला स्वतः पोलीस स्टेशनला नेऊन सोडतो. माझा मुलगा काही पळून गेला नाही. तो लपत नाही. एसपी साहेबांनी सांगितल्यानंतरही जवाब का घेतला जातो? असा प्रश्न विचारत या प्रकरणात पोलिसांवर काहीतरी दबाव असल्याचा आरोप यावेळी बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

खासदार बजरंग सोनावणे म्हणाले की, "काही आरोपी सरकार असताना, सत्ता असताना पळत होते. आम्ही कुठेही गुन्हेगार नाहीत म्हणून उजळ माथ्याने फिरतोय. काही जणांचं म्हणणं आहे की आरोपी नसला तरी माझ्या मुलाचं नाव या प्रकरणात घेण्यात यावं. अटक करा आणि पुन्हा नंतर त्याला सोडून द्या, असं काहीचं म्हणणं असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पण या प्रकरणात काहीही संबंध नसताना नाव कसं घेणार? हे जमणार नाही."

Beed Crime Vilas Ghule Case : नेमकं काय आहे प्रकरण?

केज तालुक्यातील टाकळी येथे 20 जूनच्या रात्री हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेल्या विलास घुले या निष्पाप तरुणावर आरोपींनी जीवघेणा वार केला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्हा संतप्त झाला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी तब्बल तीन दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तसेच विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी प्रशासनाचा निषेध केला होता. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपासाची चक्रे फिरवत विविध ठिकाणाहून एकूण 9 आरोपींना अटक केली आहे.

ही बातमी वाचा: