Akshay Shinde Encounter : बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले होते. दरम्यान, आरोपीचे एन्काऊंटर झाल्यानंतर पीडित मुलींच्या आई-वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "अक्षय शिंदेचं एन्काऊंटर ही चांगली गोष्ट नाही, सरकारने शिक्षा द्यायला हवी होती. त्याची चौकशी करायला हवी होती. या प्रकरणात अनेक जण सामील असू शकतात. हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे", अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली आहे. 

Continues below advertisement

पीडित मुलीची आई काय म्हणाली? 

एन्काऊंटर झालाय ही चांगली गोष्ट नाही, त्याला सरकारने शिक्षा द्यायला हवी होती. मुलगी मध्यरात्रीची झोपेतून रडत रडत उठते, घाबरते रडत बसते, अजूनही ती या परिस्थितीमधून सावरलेली नाही.  सुरुवातीला दोन-तीन दिवस पोलीस वेगवेगळे अधिकारी चौकशीसाठी आले. त्यानंतर कोणीही आमच्या घरी आले नाही.  अक्षय शिंदे याची चौकशी होणं अपेक्षित होतं. त्याच्यासोबत कोण कोण होतं? त्याला शाळेत का घेतलं होतं? याची चौकशी करणे अपेक्षित होतं. एन्काऊंटर व्हायला नको होतं. अजून चौकशी व्हायला हवी होती. यामध्ये अनेक लोक सामील असणार त्याचा एन्काऊंटर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असंही पीडित मुलीच्या आईने म्हटलं आहे.  

जेव्हा आम्हाला ही घटना समजली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही धाव घेतली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या मुलीने दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद न घेता तासंतास त्या ठिकाणी आम्हाला बसून ठेवले होते. मुलीचं मेडिकल केलेलं शितोळे मॅडम यांना दिले. मात्र त्यांनी सायकल चालवल्याने हे झाले असेल असे त्यांना सांगितले. उल्हासनगरच्या रुग्णालयामध्ये रात्र आणि दिवस घालवला. आम्हाला पोलिसांनी किंवा दवाखान्यातल्या लोकांनी साथ दिली नाही. आमच्या मुलीचे हाल करून सोडले होते.

Continues below advertisement

वडिलांवरती आवाज करून पोलीस बोलत होते. तुमचे पेपर तुम्ही शोधून आणा टेबलावरती पेपर असतानाही आमची धावपळ करायला लावली. शाळा सुरू झाली आहे आम्हाला फोन येत आहेत. मुलीला शाळेत जायचे नाही, मुलगी अजूनही घाबरलेली आहे. ती कोणासमोरही येत नाही ते कोणाशीही बोलत नाही.

शाळेतील कॅमेरे बंद आहेत असे सांगितले गेले. माझी मुलगी मला सांगायची ती एकटीच बाथरूमला जात होती. बाथरूम जवळ गेल्यानंतर दादांनी मला मारलं होतं. पोलिसांनी डॉक्टरांनी मुलीला जे विचारलं ते सगळं मुलीने सांगितले आहे. शाळेच्या ट्रस्टींना जामीन मिळणं हे आम्हाला बरोबर वाटत नाही. आम्हाला कुठले पत्र दिले नाही, या अगोदर प्रत्येक वेळी आम्हाला पत्र पाठवायचे. आता या सहा आरोपींना जामीन आहे हे आम्हाला त्यांनी कळवले नाही.

पीडित मुलीचे वडिल काय काय म्हणाले? 

हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळेच्या ट्रस्टीनी केला. त्यांची प्रतिष्ठा, शाळेचे नाव त्यांना महत्त्वाचे वाटले. शाळेत प्रिन्सिपलला भेटलो तेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलने आम्हाला असं सांगितले की अशा घटना आमच्या शाळेत होत नाहीत. शाळेमध्ये सर्व स्टाफ लेडीज आहेत. माणसं कोणीच नाहीत. सीसीटीव्ही बघण्यासाठी विचारले असता प्रिन्सिपलने असे सांगितले की, सीसीटीव्ही गेले पंधरा दिवसापासून बंद आहे. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले, आपण सीसीटीव्ही बंद आहे. याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Gunaratna Sadavarte : बिग बॉसमधील एन्ट्रीआधीच गुणरत्न सदावर्तेंना जीवे मारण्याची धमकी, थेट पोलीस स्थानक गाठलं