अंबरनाथ : गंधकानं भरलेल्या ट्रकनं पेट घेत कार आणि रिक्षाला धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या विचित्र अपघातात रिक्षातील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर कार, ट्रक आणि रिक्षा ही तिन्ही वाहनं जळून खाक झाली.


अंबरनाथच्या एका कंपनीतून गंधकाच्या गोण्या भरून एक ट्रक काल कल्याणला निघाला होता. पाईपलाईन रोडने हा ट्रक जात असताना आनंदनगर पोलीस चौकीच्या पुढे लागणाऱ्या चढणीवर ट्रकमधून गंधकाच्या काही गोण्या खाली पडल्या. या गोण्या उचलण्यासाठी ट्रकमधून एक व्यक्ती खाली उतरला, मात्र याचवेळी ट्रकनं अचानक पेट घेतल्यानं ट्रकच्या चालकाने ट्रक तसाच सोडून उडी मारली. यावेळी ट्रक चढणीवर असल्यानं तो रिव्हर्स आला आणि मागे असलेल्या एका कारला ट्रकने धडक दिली. 


यावेळी ट्रकमधून जळतं गंधक कारमध्ये पडल्यानं कारने पेट घेतला. त्यामुळे कारचालकाने जीव वाचवण्यासाठी कारमधून उडी मारली. त्यानंतर हा ट्रक आणखी मागे गेला आणि थेट एका रिक्षेला चिरडत वालधुनी नदीच्या पुलावर जाऊन अडकला. यावेळी रिक्षानेही पेट घेतल्यानं रिक्षेत असलेले वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर या दोन प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. हे दोघेही अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे आहेत. सुदैवानं रिक्षाचालकाने ट्रक रिव्हर्स येताना पाहून रिक्षेतून उडी मारल्यानं तो या अपघातातून बचावला.


या अपघातानंतर तिन्ही वाहनांनी पेट घेतल्यानं पाईपलाईन रोडची डोंबिवली दिशेला जाणारी मार्गिका बंद झाली. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंबरनाथ पालिका अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्यानं ट्रक बाजूला करून रिक्षेतील दोन प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली.


या विचित्र अपघातानंतर निष्काळजीपणे केमिकलची वाहतूक करणाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कालच उल्हासनगरात टँकरमधून सल्फ्युरिक ऍसिड अंगावर सांडल्यानं तीन जण जखमी आले होते. यानंतर आज अंबरनाथमध्ये ही मोठी दुर्घटना घडली असून अशा निष्काळजी लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जातेय.