Paisa Jhala Motha :  "गेल्या वर्षाभराची आकडेवारी पाहिली तर चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव स्थिर आहेत. भारत हा आयातप्रधान देश आहे. आपल्याकडे सर्वात जास्त इंधनाची आयात केली जाते. परंतु, इंधनाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय परदेशी बाजारपेठांमधील व्याजदर वाढत आहेत. त्यामुळे पैसा परत जात आहे. याबरोबरच अमेरिकी बाजारपेठेत घसरण झाल्यामुळे अनेक शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना याचा फटका बसला आहे. याबरोबरच रूपयाची घसरण झाली. या सर्वाचाच फटका शेअर मार्केटला बसला आहे. परंतु, पुढील एक ते दीड वर्षे शेअर मार्केटमध्ये मोठी हालचाल होणार नाही. त्यामुळे येणारा काळ हा गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला असल्याचे मत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक ( Nikhil Naik) यांनी व्यक्त केले आहे. ते एबीपी माझाच्या (Abp Majha) 'पैसा झाला मोठा' (Paisa Jhala Motha : ) या कार्यक्रमात बोलत होते. 


गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण होत होती. परंतु, मागच्या 15 दिवसांपासून शेअर बाजारात वाढ होत आहे. दोन महिन्यांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठा परिणाम झाला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये महागाई वाढली आहे. भारतात देखील महागाईमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शेअर बाजारात देखील चढ-उतार होत होते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करायची की नाही, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. याच पार्श्वभूमिवर गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात संवाद साधला आहे. 


जभरातील अनेक घडामोडींसह महागाईचा देखील शेअर मार्केटवर परिणाम होत आहे. मे महिन्यात पाच टक्क्यांनी इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे इतर वस्तूंचे भाव वाढले. याचा देखील शेअर मार्केटला फटका बसल्याचे निखिल नाईक सांगतात.  


"सध्या मार्केटमध्ये करेक्शन होत असून पुढील काळात देखील हे करेक्शन होऊ शकते. पुढील एक-दीड वर्षे मार्केटमध्ये मोठी हालचाल होणार नाही. शिवाय परदेशी गुंतवणुकदार गुंतवणुकीसाठी भारताकडे आकर्षीत होऊ शकतात.  त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे, असे निखिल नाईक यांनी सांगितले.