नवी दिल्ली : देशभरातील इंटरनेट युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतात पुढच्या वर्षी म्हणजेच, 2021 च्या उत्तरार्धात 5जी सेवा लॉन्च होण्याची शक्यता असल्याची माहिती रिलायन्स जियोचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली आहे. दरम्यान, यासाठी काही बदल आणि वेगाने प्रक्रिया करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत ही प्रक्रिया सुलभ आणि स्वस्त केली जात नाही तोपर्यंत ती सर्वांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे.


मुकेश अंबानी बोलताना म्हणाले की, 2021मध्ये जियो भारतात 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही 5G सर्विस पूर्णतः स्वदेशी असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीही स्वदेशी असणार आहे. जियोमार्फत आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत.


ते म्हणाले की, भारताला 5G स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याचसोबत त्यांनी हेदेखील सांगितलं की, जियो 5G नेटवर्क सेवेचं नेतृत्त्व करणार आहे. भारतात येणाऱ्या काही दिवसांत सेमी कन्डक्टरचं मॅन्युफॅक्चरिंगचं केंद्र बनू शकतं. आम्ही सेमी कन्डक्टरसाठी केवळ बाहेरील देशांच्या मदतीवर अवलंबून राहू शकत नाही.


देशात सध्या 30 कोटी 2G फोन युजर्स आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन अद्याप पोहोचलेला नाही आणि त्यासाठी त्यांनी धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. अंबानी म्हणाले की, आम्ही डिजिटल पद्धतीने खूप चांगले कनेक्ट झालो आहोत. तरिदेखील 300 मिलियन लोक आताही 2G स्मार्टफोनचा वापर करत आहेत.


भारतात 2021 मध्ये 5G लॉन्च होणार; दूरसंचार कंपनी एरिक्सनचा दावा


प्रमुख दूरसंचार कंपनी एरिक्सनच्या एका रिपोर्टनुसार, जगभरात 2026 पर्यंत 3.5 अरब 5जी कनेक्शन असतील, तर भारतात 5जी कनेक्शनची संख्या ही जवळपास 35 कोटी इतकी असेल. एरिक्सनचे नेटवर्क अधिकारी (दक्षिण पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत) प्रमुख नितीन बंसल यांनी सांगितले की, जर स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षाच्या सुरुवातीला झाला, तर भारताला त्याचं पहिलं 5जी कनेक्शन 2021 मध्येच मिळू शकतं. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट - 2020 नंतर जगभरात एक अब्ज लोक असे असतील, जे जागतिक लोकसंख्येचा 15 टक्के हिस्सा असून त्यांची 5G कव्हरेजपर्यंत पोहोच असेल.


रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत जगभरातील 60 टक्के लोकसंख्या 5G सेवेचा लाभ घेत असेल. तसेच तोपर्यंत 5G ग्राहकांची संख्या वाढून 3.3 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात 5G ग्राहकांची संख्या तोपर्यंत 35 कोटींचा आकडा पार करू शकते. जी भारतातील एकूण मोबाईल वापरकर्त्यांच्या एकूण 27 टक्के इतकी आहे.