Changes from 1st July 2022 : एक जुलै 2022 पासून देशात आर्थिक व्यवहाराबाबतच्या काही नियमात बदल होणार आहेत. त्याशिवाय काही वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. या बदलांचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे. जाणून घ्या 1 जुलैपासून नेमका काय होणार आहे बदल...


1. ऑनलाइन पेमेंटसाठी टोकन सिस्टीम


1 जुलैपासून ऑनलाइन शॉपिंग कंपन्या, व्यापारी आणि पेमेंट गेटवे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा सेव्ह करू शकणार नाहीत. बँक ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक 1 जुलैपासून कार्ड टोकनायझेशन प्रणाली सुरू करणार आहे. या अंतर्गत, कार्डचे तपशील टोकनमध्ये रूपांतरित केले जातील. ऑनलाइन व्यवहाराची ही एक सुरक्षित पद्धत असणार आहे. 


2. आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा दंड


केंद्र सरकारने दंड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली आहे. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपयांच्या दंडासह आधार-पॅन लिंक करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आता  एक जुलैपासून या दंडाच्या रक्कमेत वाढ होणार असून 1000 रुपयांच्या दंडासह  आधार-पॅन कार्ड लिंक करता येणार आहे. 


3. भेटवस्तूंवर 10 टक्के टीडीएस


उद्योग आणि विविध व्यवसायांमधून मिळणाऱ्या भेटवस्तूंवर 1 जुलै 2022 पासून 10 टक्के टीडीएस लागू होणार आहे. हा कर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि डॉक्टरांनाही लागू होणार आहे. एखाद्या कंपनीने मार्केटिंगच्या उद्देश्याने  सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सला उत्पादन, वस्तू दिल्यास त्यावर टीडीएस लागू होणार आहे. मात्र, जर तेच उत्पादन, वस्तू कंपनीला पुन्हा दिल्यास त्यांना टीडीएस भरावा लागणार नाही. 


4. क्रिप्टोकरन्सीवर द्यावा लागणार टीडीएस 


IT कायद्याच्या नवीन कलम 194S अंतर्गत, 01 जुलै 2022 पासून, क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार एका वर्षात 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यावर एक टक्के शुल्क आकारले जाईल. आयकर विभागाने व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व NFTs किंवा डिजिटल चलने त्याच्या कक्षेत येतील.


5. डिमॅट खात्याचे केवायसी अपडेट करता येणार नाही 


डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठीची केवायसी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 30 जूनपर्यंत करावी लागणार आहे. एक जुलै नंतर तुम्ही KYC अपडेट करू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी, डिमॅट खात्यांसाठी केवायसी 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते, परंतु सेबीने अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवली.


6. दुचाकींची किंमत वाढणार 


एक जुलैपासून देशात दुचाकींच्या किंमतीत वाढ होणार आहे. हीरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किंमतीत तीन हजार रुपयांनी वाढ केली आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि महागाई यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. हीरो मोटोकॉर्प ही भारतीय बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. हीरोच्या निर्णयानंतर इतर वाहन कंपन्यांकडून वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


7. एसीच्या दरात वाढ होणार 


दुचाकींच्या किंमतीसह एक जुलैपासून एसीदेखील महाग होणार आहे. Bureau of Energy Efficiency ने एसीच्या एनर्जी रेटिंगमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता 5 स्टार रेटिंग कमी होऊन 4 स्टार होणार आहे. नवीन Energy Efficiency लागू झाल्यानंतर एसीच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.