नवी दिल्ली : केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नव्या श्रम संहिता लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या चार श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 याचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 29 कायद्यांमध्ये सुधारणांसाठी या संहिता लागू करण्यात आल्या आहेत. नव्या लेबर कोडमुळं आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी होईल, असं सांगण्यात आलं आहे.
New Labour Code : नव्या लेबर कोडमुळं काय फायदा होणार?
केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांच्या पोस्टनुसार सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे. युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल. निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. 40 वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल, असं मनसूख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मनसूख मांडवीय पुढं म्हणाले हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून विकसित भारत 2047 चं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल, असं मनसूख मांडवीय म्हणाले.
भारतातील अनेक कामगार कायदे स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच 1930 ते 1950 च्या काळातील आहेत. अर्थव्यवस्था आणि जग बदललं आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था अपडेट झाल्या असून त्यांनी अलीकडच्या दशकात लेबर रेग्युलेशन्स केल्या आहेत. भारतात तुटक, किचकट, कालबाह्य तरतुदी असणारे 29 केंद्रीय कायदे होते. नव्या चार लेबर कोडची अंमलबजावणी आधुनिक जागतिक ट्रेंडसशी जोडून घेणार आहेत. या नव्या कोडमुळं कामगार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असं सांगण्यात आलं आहे.