Income Tax Return : प्राप्तिकर विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित केली आहे आणि वारंवार एसएमएस पाठवून करदात्यांना जागरूक देखील करण्यात येत आहे. यावेळी विभागाकडून अनेक प्रकारचे एसएमएस येत असल्याने करदात्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.


तुम्हाला आयकर विभागाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे एसएमएसही येत असतील. याबाबत घाबरून जाण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही. या एसएमएसमध्ये दिलेले मेसेज तुम्हाला समजल्यानंतर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतील. याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयटीआर अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने भरू शकाल.


डेटा पडताळणीचा अर्थ काय? -
आयकर विभाग यावेळी करदात्यांना नवा संदेश देत आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास आणि आयटीआर भरण्यापूर्वी सर्व डेटा सत्यापित करण्यास सांगितले जात आहे. आयकर विभागाकडून येणाऱ्या अशा एसएमएसमध्ये आयटीआर भरण्यापूर्वी तुमचा डेटा फॉर्म २६एएस आणि अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (एआयएस) सारख्या कागदपत्रांद्वारे एकत्र करा असं म्हणण्यात आलं आहे. 


यावेळी आयकर विभाग वार्षिक व्यवहारांशी संबंधित सर्व डेटा AIS मध्ये समाविष्ट करून देत आहे, ज्यामुळे केवळ रिटर्न भरणे सोपे नव्हे तर पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय, तुमची गुंतवणूक माहिती फॉर्म 26AS मध्ये देखील असेल, जी ITR फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीशी जुळवून सत्यापित करावी लागेल. तुम्ही हे दोन्ही फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.


लवकरच ITR भरण्यासाठी मेसेज -
दुसऱ्या प्रकारच्या एसएमएसमध्ये, आयकर विभाग करदात्यांना लवकरात लवकर त्यांचे आयकर रिटर्न भरण्यास सांगतो. या एसएमएसमध्ये रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेचा हवाला देऊन करदात्यांना शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विभागाने यावर्षी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत, उशीर न करता तुमचा रिटर्न लवकर भरणे चांगले.