Goat Farming In Bihar: बेरोजगारी (unemployment) ही आज देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनताच नाही तर सरकारही त्रस्त आहे. सरकारकडे रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेकडून सातत्याने होत आहे. त्याचबरोबर बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत बिहार सरकारनं (Bihar Govt) बेरोजगार तरुणांसाठी एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 


शेळीपालनासाठी सरकारकडून 50 ते 60 टक्के सबसिडी 


बिहार सरकारने बिहारमधील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार सरकार इथल्या तरुणांना शेळीपालनाचा व्यवस्याय (Goat Farming) करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे. शेळीपालनासाठी सरकार 50 ते 60 टक्के सबसिडी देत ​​आहे. ज्याच्या मदतीने बेरोजगारी तर कमी होईलच पण राज्यात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. काय आहे ही योजना जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


बिहार सरकारने बिहार शेळीपालन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेळीपालनासाठी शेळी फार्म उघडण्यासाठी नागरिकांना आर्थिक सहाय्य करणार आहे. ही योजना बिहार सरकारच्या पशु आणि मत्स्यसंपत्ती विभागामार्फत चालवली जात आहे. राज्यातील बेरोजगार नागरिकांसोबतच शेतकरीही बिहार शेळीपालन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अनुदानाची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना 50 टक्के अनुदान दिले जात आहे. तर SC, ST आणि मागासवर्गीयांना 60 टक्के अनुदान दिले जाईल.


शेळीपालन योजनेसाठी बिहार सरकारनं ठेवलं 2 कोटी 66 लाख रुपयांचं बजेट


शेळी फार्म उघडण्यासाठी, बिहार सरकार 10 शेळ्या + 1 शेळी, 20 शेळ्या + 1 शेळी, 40 शेळ्या + 1 शेळीच्या आधारावर 2.45 लाख रुपयांपर्यंत अनुदान देते. त्यापैकी 50 टक्के अनुदान शासनाकडून सर्वसामान्य जातीतील लोकांना दिले जाते. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना 60 टक्के अनुदान दिले जाते. बिहार शेळीपालन योजनेसाठी बिहार सरकारने 2 कोटी 66 लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक नागरिक अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि शेळीपालन उघडण्यासाठी अनुदानाची रक्कम मिळवू शकतात.


अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या वतीन जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशातील 25 वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी 42.3 टक्के बेरोजगार आहेत. देशातील बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) 2019-20 मध्ये 8.8 टक्के होता, जो 2020-21 मध्ये 7.5 टक्के आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 6.6 टक्क्यांवर आला आहे. अहवालानुसार, देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


Unemployment In India: देशात 25 वर्षांखालील 42 टक्के तरुण बेरोजगार; अहवालातून भीषण वास्तव समोर