मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांनी (Reliance Industries Sharesholders) ईशा अंबानी (Isha Ambani), आकाश अंबानी (Akash Ambani) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांची कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) संचालक मंडळावर तीन भावंडांना नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.
90 टक्क्यांहून अधिक भागधारकांनी मंजुरी
रिलायन्स इंडस्ट्रीजने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, हा ठराव 26 ऑक्टोबर 2023 रोजी बहुमताने मंजूर करण्यात आला होता. ईशा अंबानी यांच्या नावासाठी एकूण 98.21 टक्के मते मिळाली आहे. तर आकाश अंबानी यांना 98.06 टक्के मते मिळाली आहेत, तर अनंत अंबानी यांना एकूण 92.67 टक्के मते मिळाली आहेत.
संचालक मंडळाकडून यापूर्वीच मंजुरी
28 ऑगस्ट 2028 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, ईशा, आकाश, अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून समावेश केला जाईल. या तिघांचाही संचालक मंडळात समावेश करण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच मान्यता दिली होती. पण भागधारकांच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांनीही या तिन्ही भावंडांचा बोर्डात समावेश करण्यास मान्यता दिली आहे. नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता.
रिलायन्सची धुरा पुढील पिढीकडे जाण्याची प्रक्रिया सुरू....
ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे वेगवेगळे व्यवसाय हाताळत आहेत. रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानीकडे आहे, याशिवाय तिला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनवण्यात आले आहे. आकाश अंबानी यांच्याकडे रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या टेलिकॉम आणि डिजिटल व्यवसायाची जबाबदारी आहेत. तर अनंत अंबानीकडे ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी आहे. ऑगस्ट महिन्यातील एजीएमला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले होते की ते रिलायन्सच्या पुढच्या पिढीचे नेतृत्व तयार करतील. आकाश, ईशा आणि अनंत यांचे मार्गदर्शन हे त्याचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. जेणेकरून ते सामूहिक नेतृत्व देऊ शकतील आणि येत्या दशकात रिलायन्स समूहाला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ शकतील.