Nirmala Sitharaman on Jan Dhan Yojana : आज 28 ऑगस्ट रोजी जन धन योजनेला (Jan Dhan Yojana) 10 वर्षे पूर्ण होत आहेत. बहुतांश जनधन खाती महिलांची आणि खेड्यात राहणाऱ्यांची असल्याची माहिती यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी दिली. सध्या देशात 53 कोटी जन धन खात्यात 2.3 ट्रिलियन रुपये आहे.  सरकार आणखी 3 कोटी नवीन खाती उघडणार आहे. 


53 कोटी जन धन खात्यापैकी 80 टक्के खाती सक्रिय असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच, ऑगस्ट 2024 पर्यंत, या खात्यांची सरासरी शिल्लक 4352 रुपये झाली आहे, जी मार्च 2015 मध्ये 1,065 रुपये होती. निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की या आर्थिक वर्षात सुमारे 3 कोटी जन धन खाती आणखी उघडली जाणार आहेत. 


 प्रधानमंत्री जन धन योजनेचा 10 वा वर्धापन दिन 


प्रधानमंत्री जन धन योजनेच्या (PMJDY) 10 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की कोविड महामारीच्या काळात या योजनेने सरकारला खूप मदत केली. याचा महिलांनाही मोठा फायदा झाला आहे. या खात्यांमध्ये शून्य शिल्लक आणि किमान शिल्लक राखण्याचे कोणतेही बंधन नाही. असे असूनही, केवळ 8.4 टक्के खात्यांमध्ये शून्य शिल्लक आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा खेड्यापाड्यात आणि शहरात राहणाऱ्या लोकांना झाला आहे. या भागात सुमारे 66.6 टक्के जन धन खाती उघडली आहेत.


53.13 कोटी खात्यांपैकी 29.56 कोटी खाती महिलांची 


वित्त मंत्रालयानुसार, 14 ऑगस्ट 2024 पर्यंत 53.11 कोटी खात्यांपैकी 55.6 टक्के (29.53 कोटी) खाती महिलांकडे आहेत. देशातील सुमारे 99.95 टक्के खेड्यांपासून 5 किमीच्या परिघात बँक शाखा, एटीएम, बँकिंग करस्पॉडंट आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यासह काही टचपॉईंटद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. देशात 1.73 अब्ज पेक्षा जास्त ऑपरेटिव्ह चालू खाती आणि बचत खाती आहेत. त्यापैकी 53 कोटींहून अधिक जन धन खाती आहेत.


सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून करोडो लोकांना दिलासा


निर्मला सीतारामन म्हणाल्या की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 20 कोटी लोकांना 436 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात आला आहे. तसेच, सुमारे 45 कोटी लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 20 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देण्यात आला आहे. अटल पेन्शन योजनेत 6.8 कोटी लोकांचाही सहभाग आहे. स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 53,609 कोटी रुपयांची 236,000 कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. 65 लाखांहून अधिक पथ विक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून 12,630 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे.