Blog : कोण म्हणतंय पुण्यात (Pune) कमळ फुलणार, कोण म्हणतंय पुण्यात धंगेकरच येणार, तर कोण म्हणतंय वसंत मोरे मतं खाणार, तर काही जणं म्हणतात मोदीच येणार. तर याच लोकसभा निवडणुकीचा कौल जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो पुण्यात. पुणेकर यंदा मत नक्की कोणाला देणार? या प्रश्नावर पुणेकरांच्या प्रतिक्रिया ऐकून तर आम्हाला घामच फुटला. काहींनी प्रतिक्रिया कमी आणि अपमानच जास्त केला. आता मी मुळात पुण्याचा असल्यामुळे मला या मतदारसंघाची माहिती होतीच. या आधीच्या निवडणुका मी जवळून बघितल्या होत्या.


धंगेकरांना मुलाखतीसाठी तयार करायचं कसं?


पुण्यातला पहिला दिवस पार पडला तो म्हणजे तात्यांसोबत, म्हणजेच वसंत मोरेंसोबत. पहिला दिवस तर पार पडला, पण आता टेन्शन होतं दुसऱ्या दिवसाचं. कारण पुढची भेट होती रवींद्र धंगेकरांची, त्यात रवींद्र धंगेकरांनी आम्हाला मुलाखतीची वेळ दिली नव्हती. संध्याकाळपर्यंत त्यांची वेळ निश्चित होईल, अशी प्रार्थना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केली आणि आम्ही जवळच बुक केलेल्या हॉटेलवर येऊन थांबलो.


आणि अखेर धंगेकरांची वेळ मिळाली


आता मधल्या वेळात करायचं काय? हे सुचेनासं झालं. त्यात आपल्या शहरात आपले मुंबईचे सहकारी आलेत म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण पुणेकर नेहमी प्रत्येकाचा अपमान करतात, या वाक्याला मी छेद देण्याचा प्रयत्न केला आणि आईला फोन लावला अन् माझ्यासोबत मुलाखत घेण्यासाठी आलेल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना माझ्या घरी जेवायला घेऊन गेलो. पण गाडीतून जात असताना धंगेकरांसोबत बोलणंही सुरु होतंच. त्यांच्या वेळेशी मिळतं जुळतं करण्यासाठी आम्ही जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होतो... आणि अखेर घरी पोहोचेपर्यंत धंगेकरांनी सकाळी 11 वाजताची वेळ दिली.


मुंबईकरांचा पुणेरी पाहुणचार


आता धंगेकरांनी वेळ दिलीये, या आनंदात आम्ही आईने बनवलेल्या चिकन आणि भाकरीवर मजबूत ताव मारला. खरं तर मुंबईत पश्चिम महाराष्ट्रासारखं नॉन-व्हेज मिळत नाही. मग मुंबईतल्या ऑफिसमधून माझ्या घरी आलेले विनोद सर आणि संकेतनं आपली पोटपूजा करुन तृप्त ढेकर दिला, आणि आम्ही विनोद सरांना सी ऑफ करायला माझ्या बिल्डींगच्या खाली आलो. कारण त्यांना मुंबईला जाऊन आमच्या शोचा पहिला एपिसोड एडिट करायचा होता.


...आणि आमचा आधार मुंबईला गेला


पण हा माणूस उद्यापासून आमच्यासोबत नसेल याचंही फार टेन्शन आमच्यासमोर होतंच. आणि हीच अवस्था पाहून मी आणि संकेतनं सरिता कौशिक मॅडमना फोन केला आणि आमची समस्या त्यांना सांगितली. त्यावर त्यांनी ऑफिसमधली मॅनपॉवर बघून विनोद सरांना तुमच्यासोबत परत पाठवते, असं आश्वासन आम्हाला दिलं आणि या आशेवर आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.


जब मिल बैठे चार जण...


आता उद्या सकाळी धंगेकर मुलाखतीसाठी फिक्स झालेत, या आशेवर आम्ही सुखाची झोप घेण्यासाठी हॉटेलवर आलो आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावरच्या वाडेश्वरजवळ धंगेकरांनी भेटीची वेळ दिली. आम्ही वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचलो. तिथे पोहोचून आमचा पुण्याचा प्रतिनिधी मिकी घईलाही फोन लावला. तोही तातडीनं तिथे दाखल झाला. मग वाडेश्वर हॉटेलला सुरू झाली आमच्या चौघांची, म्हणजेच मी, संकेत, मिकी आणि रविंद्र धंगेकर यांची मिटींग...


आणि अखेर धंगेकरांना 'जय-वीरु'शो ची कन्सेप्ट आवडली


धंगेकरांना शो ची कन्सेप्ट समजावून सांगितली. त्यांना ती आवडली देखील, पण त्यांची अट सर्वसामान्य पुणेकरांसारखीच होती. ती म्हणजे, आता ऊन फार आहे. आपण संध्याकाळी 5-6 वाजता शूट करू. त्यावर त्यांना आम्ही समजावलं की, आम्हाला लगेच शूट करुन तो एपिसोड मुंबईला पाठवावा लागेल, तरच तो वेळेत एडिट होईल.. पण ऐकतील ते धंगेकर कसले... मिकीनेही त्यांना समजावलं आणि आम्ही त्यांना कसंबसं दुपारी 4 वाजता कसबा पेठेत यायला सांगितलं...


पुणेकर आणि दुपारचे 1 ते 4


मग आम्ही वाडेश्वरमधून बाहेर आलो, पण आता चार वाजेपर्यंत करायचं काय? असा प्रश्न आमच्यासमोर होता. मग आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचं ठरवलं. प्रतिक्रिया घेऊन आम्ही आमचा जठरअग्नी शांत करण्यासाठी पोहोचलो टिळक रस्त्यावरच्या हॉटेल गिरीजाला. इथे आल्यावर मस्त आमरस पुरीवर सर्वांनी ताव मारला. जेवण झाल्यावर आम्ही निघालो कसबा पेठेच्या दिशेनं...


आणि अखेर हाती निराशाच


वैद्य उपहारगृहाच्या समोर आम्ही गाडी पार्क केली आणि धंगेकरांना फोन लावला. मात्र धंगेकरांचा फोन स्वीट्च ऑफ आला... एक-एक गोष्ट जशी हातून निसटत जाते, आगदी तशीच काहीशी आमची परिस्थिती झाली... धंगेकरांना आम्ही फोन लावत राहिलो, मात्र धंगेकरांचे फोन काही लागलेच नाहीत... आणि आमचा आजचा दिवस फुकट गेला.....


मिळालेली संधी, आव्हानांचा डोंगर अन् पेललेलं शिवधनुष्य, अशी झाली सुरुवात 'जय-वीरु'च्या प्रवासाची