१९ नोव्हेंबर, २०२३ - भारत वनडेच्या फायनलमध्ये


२९ जून, २०२४ - भारत टी-ट्वेन्टीच्या फायनलमध्ये


आणि आता


९ मार्च २०२५ - भारत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये


आयसीसीच्या लागोपाठच्या तिन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपदासाठीची मेगा फायनल खेळण्याचा मान रोहितसेनेने मिळवलाय. दुबईच्या मैदानात कांगारुंना लोळवून भारताने एक पाऊल ट्रॉफीकडे टाकलंय. तरीही प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आपलं फायटिंग स्पिरीट दाखवलं. पण, यावेळी आपल्यासमोर त्यांची डाळ शिजली नाही. टॉसचं दान पारड्यात पडल्यावर मोठी धावसंख्या उभारुन भारतावर दबाव आणायचा या रणनीतीने ऑस्ट्रेलियाने हेडच्या तडाखेबाज बॅटिंगने आक्रमक स्टार्ट घेतलेला. शमीच्या सुरुवातीच्या काही षटकांनंतर हेडने प्रतिहल्ला करायला सुरुवात केली. तेव्हा वनडे वर्ल्डकप फायनल २०२३च्या धडकी भरवणाऱ्या आठवणी जाग्या झाल्या. पण, लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने त्याच्या उधळणाऱ्या वारुला लगाम घातला. त्यामुळे त्याचा धावांचा टॉवर उभारला जाण्यापूर्वीच कोसळला. स्टीव्ह स्मिथने मग एका बाजूने आक्रमण आणि बचावाचा उत्तम मिलाफ करत अर्धशतक ठोकलं. त्याने आधी लाबूशेन आणि मग कॅरीसोबत भागीदारी केली. खेळपट्टी काहीशी धीमी होती. चेंडू काही वेळा थांबून येत होते. याच वेगाचा अंदाज न आल्याने इंग्लिसला जडेजाने फसवलं. एकीकडे स्मिथ पाय रोवून उभा असतानाच आपल्या चारही फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाला सुटू दिलं नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा मोठी भागीदारी होते, असं वाटत असतानाच आपल्या फिरकी गोलंदाजांनी सुरुंग लावले.


साहजिकच ऑसींचा 'रन'वे खडतर बनला. कॅरीच्या टोलेबाजीने कांगारुंना अडीचशे पार नेलं. तरीही पहिल्या ३० ओव्हर्समध्ये चार बाद १५० धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नंतरच्या २० षटकांत विकेट्स हातात असून ११४ धावाच करता आल्या. याचं जास्त क्रेडिट आपल्या स्पिनर्सना आणि रोहितच्या गोलंदाजीतील बदलांना जातं. चक्रवर्तीचा फसवा लेग स्पिन, त्याच्या उंचीमुळे त्याला मिळणारा बाऊन्स. त्याचा गुगली, याचं गणित फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर प्रतिस्पर्ध्यांना उमगत नाहीये. किवींविरुद्धच्या सामन्यात हे पाहायला मिळालं, तर इथेही तेच. हेडची विकेट हा या मॅचमधला मोठा क्षण होता. हाणामारीच्या षटकात त्याने ड्वाशसच्या घेतलेल्या विकेटनेही फरक पडला. अक्षरला उंचीमुळे मिळणार बाऊन्स, जडेजाच्या अचूकतेमुळे आणि टर्नमुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांची उडणारी भंबेरी तर कुलदीपची प्रभावी चायनामन गोलंदाजी यामुळे ही चौकडी समोरच्या टीमला नामोहरम करुन सोडतेय. किवीनंतर कांगारुंनाही आपल्या फिरकीने गिरकी घ्यायला लावली. दुबईच्या मैदानातील खेळपट्ट्या काहीशा संथ, फिरकीला पोषक आहेत. ज्याचा आपले गोलंदाज उत्तम फायदा उठवतायत. शमीसह आपल्या फिरकीपटूंनी कांगारुंना २६४ वर रोखलं. आव्हान फारसं मोठं नव्हतं. तरीही रोहितची टीम एक गोष्ट जाणून होती की, ऑस्ट्रेलिया नॉक आऊट फेरीत वेगळ्या आवेशात खेळते. त्यांच्यात असलेली मानसिक कणखरता, हार न मानण्याचं त्यांचं स्पिरीट कमाल असतं. खास करुन मोठ्या स्पर्धेच्या फायनलमध्ये. समोरच्या टीमची प्रत्येक धाव ते जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखी रोखतात. प्रत्येक कॅच अस्तित्त्वाची लढाई समजून जीवाच्या आकांताने पकडतात. इथे त्यांच्याकडून काही कॅचेस सुटले तरी त्यांनी मैदानातील चपळ क्षेत्ररक्षणाने काही धावा नक्की रोखल्या. म्हणूनच कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूड नसतानाही ते तगडी फाईट देणार हे आपण जाणून होतो. रोहित आणि गिल लवकर बाद झाल्यावर द ग्रेट क्रिकेट साॅफ्टवेअर प्रोग्रॅमर विराट कोहलीने मैदानात ENTER करुन LOG IN केलं. पुढे सारं काही फीड केलेल्या प्रोग्रॅमसारखं तंतोतंत दुबईच्या मैदानरुपी स्क्रीनवर पाहायला मिळालं. सावध सुरुवात. खराब फटका मिळताच चौकार. एकेरी-दुहेरी धावांचा खुराक कायम.


विराटने आधी श्रेयसच्या साथीने भागीदारीच्या इमारतीचा पहिला मजला रचला, ज्यावर विजयाची शानदार इमारत उभी राहिली. वनडे वर्ल्डकप २०२३ मध्येही अशीच रणनीती आपण अवलंबली होती. विराटने मैदानात एक बाजू भक्कम ठेवत उभं राहायचं आणि इतर फलंदाजांनी समोरुन धावफलक वेगाने वाढवायचा. हाच पॅटर्न या स्पर्धेतही कायम राहिलाय. पाकिस्ताननंतर इथेही विराटने मोठे फटके म्यान केले. अपेक्षित रनरेटही साडेपाच ते सहाच्या घरातच होता. याच कारणाने एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. त्याने ५६ एकेरी आणि ४ दुहेरी अशा ६४ रन्स धावून काढल्या. धावा पळून काढल्या. त्याचा फिटनेस कमाल आहे, ज्याचं तो वेळोवेळी दर्शन घडवत असतो. पाकिस्तानविरुद्ध त्याची झलक पाहायला मिळाली. तर इथेही प्लॅनिंग आणि फिटनेस यांच्या उत्तम संगमाचं दर्शन घडलं. विराटची सेमी फायनलमधली ही ९८ चेंडूंमध्ये ८४ ची खेळी. ज्यात फक्त पाच चौकार. तरीही स्ट्राईक रेट ८५.७१ चा.


धावांचा पाठलाग करताना कोहलीने वनडे कारकीर्दीत ८ हजारहून अधिक धावा केल्यात. या विक्रमाच्या यादीत त्याच्यापुढे फक्त सचिन आहे. यावरुन त्याचं मोठेपण कळतं. भारताबाहेरच्या वनडे मॅचेसमध्ये धावांचा पाठलाग करताना ४१ अर्धशतकं आणि २७ शतकं अशी खणखणीत कामगिरी त्याच्या नावावर आहे. आपल्याला अक्षरच्या रुपात उत्तम ऑलराऊंडर गवसलाय. जो मधल्या फळीत येऊन वेगाने धावा पळून तर काढतोच पण मोठे फटके खेळून गोलंदाजांची लय बिघडवतो. सेमी फायनलमध्ये श्रेयसची विकेट काढून कांगारुंनी कमबॅकचा प्रयत्न केला खरा. पण, अक्षरने ३० चेंडूंत २७ ची इनिंग केली आणि धावगती कायम राखली. राहुलनेही ३४ चेंडूंत नाबाद ४२ ची नाबाद खेळी करताना दोन चौकार, दोन षटकार ठोकत कोहलीवर दबाव येणार नाही याची दक्षता घेतली. विजयाचा उंबरठा जवळ आलेला असताना कोहली मोठा फटका खेळून बाद झाल्याने राहुल काहीसा अपसेट झाला होता. कारण, त्याआधीच एक षटकार ठोकत राहुलने रनरेट कव्हर केला होता. कोहलीच्या न झालेल्या आणखी एका वनडे सेंच्युरीचं शल्य राहुलच्या चेहऱ्यावर कोहली आऊट होऊन जाताना दिसलं. हार्दिक पंड्याने मग अजिबात वेळ न दवडता चेंडूला तीन वेळा स्टँडची सफर घडवून आणताना मॅच लास्ट ओव्हरपर्यंत जाणार नाही हे पाहिलं. त्याचा स्कोअर २४ चेंडूंत २८. एक चौकार, तीन षटकार. स्ट्राईक रेट ११६.६६ चा. त्याच्या फटकेबाज इनिंगने ३६ चेंडूंत ३६ धावांचं समीकरण १२ चेंडूंत ४ वर आणून ठेवलं. राहुलने विनिंग षटकार ठोकत चेंडू सीमापार केला आणि ऑसींना स्पर्धापार केलं. वनडे वर्ल्डकप, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपप्रमाणेच आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही आपण एकही सामना न गमावता फायनल गाठलीय. दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता रविवारी आपल्यासमोर उभा ठाकणार आहे. आणखी एक विजेतेपद खुणावतंय. रोहितच्या टीमच्या ट्रॉफीच्या शोकेसमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा आणखी एक झळाळता चषक पाहायला आपल्याला नक्की आवडेल.