Diwali 2023: यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीचा (Diwali 2023) सण साजरा होत आहे. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी लोक 14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्री राम अयोध्येत परतण्याचा उत्सव साजरा करतात, या दिवशी लोक आपल्या घरात आणि अंगणात दिवे लावून आसमंत प्रकाशमय करतात. दिवाळीत अनेक फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीच्या पूजेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी सकाळीच काही कामं केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते. ही कामं नक्की कोणती? जाणून घेऊया.


दिवाळीच्या सकाळी करा ही कामं



  • दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराची साफसफाई करणं शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, यामुळे देवी लक्ष्मी घरात कायम वास करते आणि संपत्तीची, धनाची कधीही कमतरता भासत नाही.

  • दिवाळीत तुळशीच्या रोपाची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी देवी वास करते असं म्हणतात. दिवाळीच्या दिवशी तुळशीची पूजा करून जल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन संपत्तीचं भांडार भरुन टाकते.

  • दिवाळीला तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणं देखील शुभ आहे.

  • दिवाळीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर अभ्यांगस्नान करावं, यानंतर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून थोडं पाणी वाचवावं. उरलेलं पाणी घरभर शिंपडावं, असं केल्याने घरात सुख-शांती राहते आणि सकारात्मकता येते.

  • दिवाळीच्या दिवशी घराची साफसफाई करून घराच्या अंगणात रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की असं केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि अशा घरात ती आधी प्रवेश करते, ज्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.


घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावा


दिवाळीच्या खरेदीत दारावर लावण्यासाठी नवीन तोरणं देखील आणली जातात, मात्र तोरण खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. तोरणामध्ये कोरडी पानं, कोरड्या फुलांचा वापर केला जाऊ नये, याची विशेष काळजी घ्या. घराच्या मुख्य दारावर नेहमी ताज्या फुलांचा हार किंवा स्वच्छ तोरण लावावं, यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023: दिवाळीनंतर 'या' 4 राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार; नववर्षातही नशीब देणार साथ, 500 वर्षांनंतर बनत असलेल्या चार राजयोगांचा परिणाम