Chanakya Niti For Motivation:  चाणक्य नीतिचा वापर आजही अनेकजण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतिला अवलंब अनेकजण करतात. चाणक्य नीतितून प्रेरणा घेत अनेकजण प्रत्यक्षात त्याचे आचरण करतात. चाणक्य नीतिनुसार व्यक्तीने आपल्या आचरणाबाबत सावध असले पाहिजे. माणसाचे यश त्याच्या गुणांवर अवलंबून असते. कधीही चुकीच्या गोष्टी करू नका. चाणक्य नीतीनुसार, जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल, तर काही चुका टाळणे आवश्यक आहे. या चुका वारंवार होत गेल्यास आपलं आयुष्य उद्धवस्त होण्याची भीती आहे. 


गरज असेल तेव्हा पैसे खर्च करा


चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने संपत्ती जमा करावी. माणसाच्या वाईट काळात पैसा कामी येतो. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, संकटाच्या वेळी पैसाही खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. पैसा माणसाकडे राहिला तर आत्मविश्वास वाढतो. पैसा नसतो तेव्हा तणाव, मतभेद आणि वादाचे कारण असते. ज्या व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करतात ते नेहमी त्रासलेले असतात. आवश्यकता असेल तेव्हा पैसा खर्च केला पाहिजे. अनावश्यक पैसे खर्च करून आपली बचत गमावता कामा नये. 


कधीही अनैतिक कृत्य करू नका


चाणक्य नीतिनुसार, जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल, तर कधीही अनैतिक अर्थात चुकीची कामे करू नका. वाईट सवयी माणसाला आर्थिकदृष्ट्या गरीब बनवतात. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर वाईट सवयींपासून दूर राहिले पाहिजे. चुकीच्या सवयी असणाऱ्यांना समाजात मान-सन्मान मिळत नाही. एखाद वेळेस तुमच्या तोंडावर लोकं तुमचे कौतुक करतील. पण, तुमच्या पाठिमागे दूषणे देतील.  


धनसंपत्तीचे संरक्षण करा


चाणक्य नीति सांगते की पैशांच्या बाबतीत गंभीर आणि सावध असले पाहिजे. जे पैशांबाबत बेफिकीर असतात, त्यांना नंतर त्रास सहन करावा लागतो. कष्टानेच संपत्ती मिळते. त्यामुळे, पैशांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. जर, पैशाचे संरक्षण केले नाही तर पैसा गमावला जातो. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.