Navratri 2022 : यावर्षीचा नवरात्री (Navratri) उत्सव 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना (Ghatstahpana)केली जाते. शेतीच्या दृष्टीनं  घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याच्या आधी केली जाते. घटस्थापना ही एक कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे.


शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व काय


घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्याआधी केली जाते. ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे. बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतू, शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.  घटनस्थापना करताना प्रथम एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते.


घटासाठी वापरण्यात येणारी माती ही आपल्या शेतातीलच का वापरली जाते


घट स्थापनेसाठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतू ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही, तर शेतकरी आपल्याच शेतातील, ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते. कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते. या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही तर रब्बी हंगामात जे पिक शेतकरी त्याच्या शेतात पेरु शकतो तेच आणि त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते. त्या मागचा हेतू त्याच्या शेतात वापरले जाणाऱ्या बियाणांची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते.


घटासाठी वापरले जाणारे पाणी शेतातील जलस्त्रोत्राचे 


घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही, तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते. जेणेकरुन त्याच्या खाली शंकू आकारात ठेवलेल्या मातीत आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.


घट नऊ दिवसच का बसवला जातो


घट नऊ दिवसच का बसवला जातो असा सर्वांना पक्ष पडला असेल. तर त्याचे कारण बियांना रुजून अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो. घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतू नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तिंकडून तळी उचलली जाते, म्हणजे घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते. जे पिक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळं घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासने सोपे जाते. दरम्यान, या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण देखील केले जाते. 


शेतकऱ्यांच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व


दरम्यान, घटनास्थापना आणि शेतीचा संबंध याबाबत एबीपी माझाने कृषी आणि हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, घटस्थापनेला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतात पिकं व्यवस्थित येईल का? तसेच शेतात पुरेस पाणी आहे का? पिकाची उगवण क्षमता चांगली राहिल का? हे पाहण्यासाठी घटस्थापना केली जात असल्याची माहिती देवळाणकर यांनी दिली. पावसाळा संपला की आपण घटस्थापना करतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त असतो. त्यामुळं त्याला शेतीच्या दृष्टीनं महत्व आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: