सोलापूर : आधीच अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या द्राक्ष उत्पादक (Grape Productive Farmers) शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सदोष औषध फवारणीने सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील एकट्या कासेगाव परिसरातील 50 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावरील द्राक्ष बागा जळाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देऊन संबंधित कंपनीवर बंदी घालण्याची मागणी कृषी मंत्र्याकडे करण्यात आली आहे. 


मागील काही वर्षात द्राक्ष उत्पादक शेतकरी सतत संकटात सापडत असल्याचे चित्र आहे. यंदा देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसर आणि मोहोळ तालुक्यातील आढेगाव, पुळूज या भागातील द्राक्ष उत्पादक, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे किटकनाशक औषध फवारणीने मोठे नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हातबल झाले आहे. 


शेतकऱ्यांकडून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न?


द्राक्ष बागेवर करण्यात आलेल्या कीटकनाशक फवारणीमुळे बागच्या बागा जळून गेल्या आहेत. त्यामुळे, संबंधित शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतील या भीतीने ग्रामस्थांनी अशा सर्व कुटुंबासोबत दोन-दोन शेतकरी ठेवण्यात आले आहे. या शेतकऱ्यांच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून चूलही पेटली नाही. तसेच, मोठ्या कष्टाने उभारलेली बागा जळाल्याने हे नुकसान कसे भरून काढायचे अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 


कंपनीवर बंदी घालण्याची मागणी...


शेतकऱ्यांनी कीटकनाशक औषधाची फवारणी केली असता, एकाच बॅचच्या पॅकिंगचे कीटकनाशक औषधांमधून फवारणी केल्यामुळे द्राक्षाची बागा जळून गेल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर खरबूज, कलिंगडची बागही जळून गेली आहे. औषध कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बागांची पाहणी केली असली तरी, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. तर, सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व सदर कंपनीवर माल विक्रीसाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व राज्य द्राक्ष बागायत संघ, सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांतभैय्या देशमुख यांनी केली आहे. 


शेतकरी दुहेरी संकटात... 


मागील काही वर्षात सतत अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यंदाही अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर कीटकनाशक फवारणी केली. मात्र, फवारणीनंतर बागच्या बागा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अवकाळीचा फटका! पंढरपुरातील द्राक्ष बागांना पावसाचा तडाखा; लाखो रुपयांचे नुकसान