Farmers News : कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा 2 मे ला नाशिकमध्ये विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं राज्यातील 198 शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यामधील तीन पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी एक कौतुकास्पद काम केले आहे. कृषी पुरस्कार मिळालेल्या तीन शेतकऱ्यांनी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. ही रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.




या शेतकऱ्यांनी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली


पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर या गावातील युवा शेतकरी समीर डोंबे यांना वंसतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. त्या पुरस्काराची रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे. सध्या पैशाची गरज ही मझ्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आहे. या माध्यमातून समाजात एक चांगला मेसेज जावा यासाठी मी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुरस्काराची रक्कम दिल्याची माहिती समीर डोंबे यांनी एबीपी माझा डीजिटलशी बोलताना दिली. ज्या क्षेत्रातूम मी येतो, त्या क्षेत्राला आपण काहीतरी देणं लागतो. नोकरी सोडून मी शेती करत आहे. या क्षेत्रातून, पैसा, प्रसिद्धी मिळाली. शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येतात, त्यावर त्यांना मात करता यावी यासाठी हा निर्णय घेतला. अंजिर उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल समीर डोंबे यांना पुरस्कार देण्यात आला.




सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटाचा सामना करत आहे. आमच्याकडे जरा चांगले उत्पादन होते. मोठ्या प्रमाणावर फळबागा आमच्या भागात आहेत. माझ्याकडे डाळिंब आणि शेवग्याची बाग आहे. यातून चांगले उत्पन्न मिळते. चांगल्या कामात आपला हातभार लागावा म्हणून ही पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सातमाने गावातील पुरस्कार प्राप्त शेतकरी विनोद जाधव यांनी दिली. विनोद जाधव यांना वंसतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे.तसेच बीड जिल्ह्यातील चिंचवडगाव येथील शेतकरी प्रल्हाद गवारे यांनाही कृषी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी देखील पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे.


नाशिकमध्ये 2 मे रोजी कृषी पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. याचबरोबर कृषीमंत्री दादाजी भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य नेतेही उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या: