मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetti) यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहित महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टी यांनी हे खरमरीत पत्र लिहिले आहे. 


राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, तुम्हाला माहिती असेल की 2013 मध्ये जंतर मंतरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा पाटकर, उल्का महाजन आणि इतर अनेक शेतकरी संघटनांनी  भूसंपादन आणि इतर समस्यांबाबत आंदोलन सुरू केले होते. सोनियाजींनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन जयराम रमेश यांना प्रश्न सोडवण्यासाठी या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले. यूपीएने सर्व राजकीय पक्षांशी समन्वय साधून देशासाठी भूसंपादन धोरण तयार केले. जे खरोखरच ऐतिहासिक ठरले.


शेट्टी यांनी म्हटलं आहे की, विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यासाठी संपादित करायच्या होत्या त्यांच्या जगण्यासाठी हे धोरण योग्य होते.पण 2015 मध्ये अदानी आणि अंबानींच्या दबावाखाली मोदीजी आणि त्यांचे सरकार यूपीए सरकारने केलेले अधिग्रहण धोरण बदलू इच्छित होते.या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना विविध शेतकरी संघटनांसह मोदीजी सरकारने सुचवलेल्या बदलांना विरोध केले. त्यावेळी तुम्ही लोकसभेत माझ्यासोबत हा मुद्दा उपस्थित केला व  बदलांना विरोध करून आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पण मोदीजींनी एक युक्ती खेळली आणि या बदलांचा चेंडू राज्याच्या कोर्टात टाकला.






शेट्टी यांनी म्हटलं आहे की, दुर्दैवाने महाराष्ट्रातील सरकारमध्ये शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षस्थानी आहेत हे सरकार या युक्तीचा बळी ठरले व शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा आपल्यापैकी काहींचा वाईट हेतू आहे हे सिध्द झाले, असं त्यांनी म्हटलं आहे. 


पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना नुकसान भरपाई निम्म्याने कमी करण्याचा ठराव करून सध्याच्या राज्य सरकारने यूपीए सरकारने मंजूर केलेल्या धोरणातच बदल सुचवले आहे.
असे दिसते की आता महाराष्ट्र सरकार मोदीजींना पाठिंबा देत आहे अगदी हा कायदा केलेल्या खात्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे आहेत.  हा कायदा लागू झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व गमावले आहे. 


शेट्टी यांनी म्हटलं आहे की,  माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने नुकतीच केलेली दुरुस्ती मागे घेण्यास महाराष्ट्र नेतृत्वाला सूचना द्या. मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणाकडे नक्कीच लक्ष द्याल आणि गरीब शेतकर्‍यांना मदत कराल राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटूंबाची उपजीविका या भरपाईच्या रकमेवर पूर्णपणे अवलंबून आहे, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha