Agriculture News : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यांची लगबग सुरु होते ती खरीप पेरणीची. पण यासाठी शेतकऱ्यांना पैश्यांची गरज असते. मात्र, सध्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते अडचणीत आले आहे. कारण या शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून आहे. नाफेडचं पोर्टल बंद झाल्यानं खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर सरकारनं तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जर खरेदी होत नसेल तर हरभरा आणि धान उत्पादकांना सरकारनं मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.


मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी : बच्चू कडू


सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले आहेत. धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहेत. केंद्र सरकारने खरेदी सुरु करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


आता काय करायचं? शेतकऱ्यांपुढे प्रश्न


अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील अभिजित लांबाडे यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यांनी पाच एकरात हरबरा लागवड केली होती. त्यामध्ये त्यांना 30 क्विंटल हरभरा झाला. यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला. हाच हरभरा विकून त्यांना आईचे उपचार आणि खरीप पेरणी करायची आहे. त्यामुळं त्यांनी नाफेडमध्ये 5 मे रोजी नोंदणी केली होती. 2 जून रोजी त्यांना हरभरा घेऊन या म्हणून मॅसेज आला. पण त्याच दिवशी त्यांना फोन आला की पोर्टल बंद असल्यानं पुढील आदेशापर्यंत आणू नका असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. हीच परिस्थिती जवळा पट येथील पराग राऊत यांची आहे. पराग राऊत यांनी तर आपलं 70 क्विंटल हरभरा वाहनात भरला होता. पण त्यांनाही फोन आला की, पोर्टल बंद असल्याने हरभरा आणू नका. पराग राऊत यांच्याकडे 20 एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी 10 एकरात हरभरा लागवड केली. यामधून त्यांना 70 क्विंटल हरभरा झाला पण आता या हरभऱ्याचे करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.


दरम्यान, सध्या बाजारात हरभऱ्याच दर 4 हजार 100 रुपये क्विंटल आहे, तर नाफेडमध्ये याचं दर 5 हजार 250 रुपये आहे. त्यामुळं शेतकरी इथंच हरभरा विकण्यासाठी प्राधान्य देत आहेत. पण सरकारच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडूच काही करु शकतात अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


महत्वाच्या बातम्या: