Agriculture News : सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात (onion Price) मोठी घसरण झाली. याचा मोठा आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. या स्थितित कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. नाफेडमार्फत (Nafed) तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal ) यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी गोयल यांना निवेदनही दिलं आहे.


कांदा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो. मात्र, मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे. त्यामुळं त्यांच्या या मागणीवर सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


मंत्री पियुष गोयल यांच्याकडून आश्वासन 


लाल कांद्यापाठोपाठ उन्हाळ कांदा नाफेडने खरेदी करण्याची मागणी मंत्री भारती पवार यांनी केली आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडने कांदा खरेदी करावा अशी मागणी पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे. राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत 2022 मध्ये रुपये 351 कोटी रक्कमेचा 2 लाख 38 हजार 196 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रुपये 1 हजार 475 प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळाला होता. यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत  कांदा खरेदी करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत मंत्री पियुष गोयल यांच्याकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. 


अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका


राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rains) हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तर नंदुरबारमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अन्य जिल्ह्यातही द्राक्ष, आंबा, संत्रा, रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे