Climate change : बदलत्या वातावरणाचा (Climate change) शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊसही पडत आहे. याचा परिणाम हापूस आंब्यावर (Alphonso Mango) होत आहे. त्यामुळं रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी (Mango farmers) चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणामुळं आंब्याची फळ प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळं लाखो हेक्टरवरील आंब्याचे पीक धोक्यात आले आहे. 


फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत


वातावरणातील बदलामुळं कोकणातला हापूस आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. कारण पीकावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. लांबलेला पाऊस, गायब झालेली थंडी आणि अवकाळी पाऊस यामुळं हापूस आंब्याची फळ प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. परिणामी लाखो हेक्टरवर असलेली आंबा पीकाची शेती धोक्यात आली आहे. या साऱ्याचा परिणाम आर्थिक उलाढालींवर देखील होताना दिसत आहे.


आंबा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव


कोकणात पडणारा अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तुडतुडया सारख्या किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने होणार आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ  झाली आहे. त्यामुळं फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.


परतीच्या पावसाचा आंब्याच्या हंगामावर परिणाम


फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी वाशी बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. परतीच्या पावसामुळं झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळं आंब्याची पहिली पेटी जरी वाशी बाजार समितीमध्ये दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे. आंबा पिकाबरोबरच कापूस, सोयाबीन या पिकांना देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. तर या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर या मालाला बाजारपेठेत योग्य तो दरही मिळताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Hapus News : बदलत्या वातावरणाचा 'हापूस' ला फटका, किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं हंगामाला उशीर होणार, शेतकरी चिंतेत