Farmers : येत्या 13 ते 19 मार्चला जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील किनगाव ते धुळे (Dhule) अशी शेतकरी सहवेदनेसाठी निर्धार पदयात्रा (Nirdhar padayatra) निघणार आहे. हे अंतर 110 किलोमीटरचे आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसह किसानपुत्र आंदोलनातील (Kisanputra Andolan) कार्यकर्ते पूर्णवेळ सहभागी होणार आहेत. डॉ राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) हे यात्रेचे मुख्य संयोजक आहेत. तर सुभाष कच्छवे (परभणी) हे त्यांना सहकार्य करणार आहेत. 


पदायात्रेचा किनगाव ते धुळे हाच मार्ग का?


किनगाव (जळगाव) ते धुळे असा पदयात्रेचा मार्ग असणार आहे. 2021 मध्ये औंढा नागनाथ ते चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) अशी सुमारे 225 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. 2022 मध्ये पानगाव (हुतात्मा रमेश मुगे यांचे गाव) ते आंबाजोगाई अशी 35 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली होती. या वर्षी किनगाव (दिवंगत सहकारी कडू आप्पा पाटील यांचे गाव) ते धुळे (दिवंगत रवी देवांग यांची कर्मभूमी) अशी पदयात्रा निघणार आहे. पहिली पदयात्रा मराठवाड्यातून निघून विदर्भात गेली होती. दुसरी मराठवाड्यात निघाली. तिसरी खान्देशात निघणार आहे. कडू आप्पा पाटील हे  शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते, किसानपुत्र आंदोलनात सक्रिय होते. त्यांनी जळगाव येथे शिबीर घेतले होते. 


शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे, अशी कडू आप्पा पाटील यांना तळमळ होती. रवी देवांग हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना गळफास ठरलेल्या कायद्यांचे सुरक्षा कवच बनलेल्या परिशिष्ट नऊची जाहीर होळी केली होती. त्यात त्यांच्यासोबत कडू आप्पाही होते. त्याबद्दल त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शेवटी न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडले होते. शेतकरीविरोधी कायद्यांच्या लढाईला तीव्र करणारे हे दोघे असल्यामुळं किनगाव ते धुळे अशी पदयात्रा काढली जात आहे. 


कसा असेल पदयात्रेचा कार्यक्रम


पदयात्रा 13 तारखेला सकाळी नऊ वाजता कडू आप्पा यांना श्रद्धांजलीची सभा घेऊन प्रारंभ होईल. धानोरा करीत अडावदला मुक्काम करेल. 14 मार्चला बारडी वरुन चोपड्याला जाईल. 15 मार्चला निमगव्हाण करुन पाटोदा येथे रात्रीचा मुक्काम करेल. 16 मार्चला गडखांबमार्गे अंमळनेरला पोहोचेल. 17 मार्चला दुपारी जानवे करुन रात्री नवलनगर येथे मुक्काम करेल. 18 मार्चला वणी बु. करीत फागणे येथे मुक्काम करेल. शेवटचा टप्पा 19 मार्चला फागणे ते धुळे असा राहणार आहे. धुळ्यात या यात्रेचा समारोप होईल.पदयात्रेत सभा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, नागरिक आणि किसानपुत्रांनी व्यवस्था केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Kisanputra Andolan : आत्महत्यामुक्त महाराष्ट्रासाठी शेतकरी विरोधी  कायदे करा रद्द, किसानपुत्र आंदोलनाचं मुख्यमंत्र्यांना पत्र