राज्यातील सातबारा उताऱ्यात महसूल विभागाकडून मोठा बदल करण्यात येणार आहे. आता प्रत्येक खातेदाराच्या नावासमोर त्याचे क्षेत्र नमूद करण्यात येणार आहेत. यासोबत फार्मर आयड़ी देखील आता बंधनकारक करण्यात आलंय. सरकारने हा नवीन निर्णय काय आहे? आपण जाणून घेणार आहोत...
राज्यातील ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त खातेदार (सहिस्सेदार) आहेत, अशा सामाईक खात्यांमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या हिश्याची जमीन स्वतंत्रपणे नमूद करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ नुसार विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील प्रत्येक खातेदार अथवा शेतकऱ्यांच्या नावासमोर क्षेत्र नमूद केले जाणार आहे. राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक आहे.
फार्मर आयडी निर्माण करताना सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद केले जाते. यामुळे फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अडचणी येत आहेत.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीक पाहणी, जमीन खरेदी-विक्री किंवा फेरफार नोंद करताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक हिस्सेदाराचे क्षेत्र त्याच्या नावापुढे असणे आवश्यक आहे, यापार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभाग घेतला आहे.