Kisan Sabha : शेतकऱ्यांसह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा लाल वादळ रस्त्यावर उतरणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Dr. Ajit nawale) यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते लोणी असा 55 किलोमीटर अंतर पायी मोर्चाला आजपासून सुरुवात होणार आहे. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याबरोबर काल मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज दुपारी या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे.


तीन दिवस चालणाऱ्या या लॉंग मार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. 28 एप्रिलचा हा मोर्चा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात धडकणार आहे. पोलिसांनी मात्र, अद्याप या मोर्चाला परवानगी दिली नसली तरी शेतकरी मोर्चावर ठाम असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली. 


केवळ बैठकांचा फार्स, मोर्चा काढण्यावर आम्ही ठाम


आज काढण्यात येणाऱ्या लॉंग मार्चसंदर्भात एबीपा माझानं किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी नवले म्हणाले की, आमची लॉंग मार्चची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. रात्रीपासूनच अकोलेमध्ये लोक जमायला सुरुवात झाली आहे. सध्या दोन हजारांच्या आसपास लोक अकोलेमध्ये जमा झाल्याची माहिती अजित नवलेंनी दिली. दुपारी तीन वाजता लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. केवळ बैठकांचा फार्स केला जातोय. त्यामुळेच मोर्चा काढण्यावर आम्ही ठाम असल्याची भूमिका डॉ. अजित नवलेंनी मांडली. मागील मोर्च्यात एक महिन्याच आश्वासन दिलं मात्र अद्यापपर्यंत एकही मागणी पूर्ण केली नसल्याचे नवलेंनी सांगितलं.


आमच्या संघटनेत नेते एसीत आणि जनता उन्हात असा प्रकार नाही 


सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र आम्ही आमचा मोर्चा पूर्ण काळजी घेऊन काढणार असल्याचे अजित नवलेंनी सांगितलं. दुपारी तीननंतर मोर्चा काढून रात्री उशिरापर्यंत चालण्याची आमची तयारी आहे. नेते एसीत आणि जनता उन्हात असा प्रकार आमच्या संघटनेत नाही असंही नवले म्हणाले. वाढलेल्या तापमानामुळं कोणाला त्रास झाला तर ती जबाबदारी आमची आहे. मात्र, तसं काही होणार नाही यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत असल्याचे नवलेंनी सांगितलं. कुणाच्या घरावर मोर्चा काढू नये आणि राजकारणासाठी कोणाच्या घरावर धाडी सुद्धा टाकू नये या मताशी मी अत्यंत सहमत आहे. आम्ही विखेंच्या घरावर नव्हे तर कार्यालयावर मोर्चा काढतोय असे नवले म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Farmers Issue: महसूल मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाहीच; किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी पुन्हा चालणार!