Milk Price : गायीच्या दुधाला किमान प्रति लिटर 42 रुपये इतका दर देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. उन्हाळ्यामुळे व अर्थव्यवस्थेतील शेतकरी विरोधी धोरणामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असल्याकडे समितीने लक्ष वेधले आहे. कोव्हिडच्या काळात कंपन्यांनी, दूध संघांनी नीचांकी दरात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले आणि त्यातून आता दूध पावडर महागड्या दरात विकून नफा कमवत असून शेतकऱ्यांना त्यात वाटा दिला जात नसल्याकडे समितीने लक्ष वेधले आहे. 


दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे महाराष्ट्र समन्यवक डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, कोव्हिडच्या पहिल्या लाटेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कोसळून 180 रुपये प्रति किलोपर्यंत खाली गेले होते. कोव्हिड महासाथीचा काही प्रमाणात प्रतिबंध झाल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधाचे उत्पादन सीमित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर आता 300 रुपये प्रति किलोपर्यंत वधारले आहेत. देशांतर्गत बाजारातही दूध पावडरला प्रति किलोस 325 रुपये दर मिळत आहे. उन्हाळ्यामुळे देशांतर्गत दुधाचे प्रमाण घटल्यामुळे दूध पावडर बनवण्यासाठी पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याने देशांतर्गत दूध पावडरचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.  परिणामी येत्या काळात दूध पावडरचे दर आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. जून अखेरपर्यंत दूध पावडरच्या दरामध्ये तेजी कायम राहणार आहे. अशा पार्श्वभूमीवर गायीच्या दुधाला किमान 42 रुपये दर देणे सहज शक्य असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. कोव्हिडच्या लॉकडाऊन काळात दूध पावडरचे दर कोसळल्याचे कारण देऊन कंपन्यांनी व दूध संघांनी शेतकऱ्यांकडून प्रति लिटर 18 ते 20 रुपये प्रति लिटर दराप्रमाणे दुधाची खरेदी केली होती, असेही त्यांनी म्हटले.


दुधाचे दर वाढवून देण्याची मागणी का?


कृषी विद्यापीठांनुसार गायीच्या दुधाचा उत्पादनखर्च प्रति लिटर 28 रुपये असताना आणि लॉकडाऊनपूर्वी दुधाला 32 रुपये दर मिळत असताना  मोठा तोटा सहन करून शेतकऱ्यांना दूध विकावे लागले. लॉकडाऊन काळात 18 ते 20 रुपये प्रति लिटर इतक्या नीचांकी दराने खरेदी केलेल्या दुधातून विविध कंपन्यांनी व दूध संघांनी दूध पावडर बनवली. त्याचे मोठे साठे करून ठेवले. आज दूध पावडरचे दर 300 रुपयाच्या पलीकडे गेले असताना स्वस्तात दुध घेऊन तयार केलेल्या दूध पावडरच्या विक्रीतून या कंपन्या व दूध संघ अमाप नफा कमवत असून  शेतकऱ्यांना मात्र या नफ्यामध्ये सहभागी करून घेण्याची त्यांची तयारी दिसत नसल्याचा दावा डॉ. नवले यांनी केला. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर  दूध पावडरचे दर कोसळल्यानंतर ज्या वेगाने देशांतर्गत दूध खरेदीचे दर पाडले जातात तितक्याच तत्परतेने  दूध पावडरचे दर वाढल्यानंतर शेतकऱ्यांकडूनचे दूध खरेदीचे दर वाढवणे अपेक्षित असते असे डॉ. नवले यांनी म्हटले. दूध संघ व दूध कंपन्या शेतकऱ्यांच्या हिताबाबत अशी तत्परता दाखवत नाहीत. सध्या दूध दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी, प्रत्यक्षात उन्हाळ्यामुळे व अर्थव्यवस्थेतील शेतकरी विरोधी धोरणामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊन व नैसर्गिक वातावरणाचा परिणाम म्हणून दुधाचे उत्पादनही घटले आहे. अशा पार्श्वभूमीवर किमान 42 रुपये दर शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. 


सरकारवर शेतकरी संघटनांची टीका


राज्याचा दुग्धविकास विभाग गेली अनेक वर्ष निष्क्रिय भूमिकेत आहे. दुग्ध विकास मंत्री दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता दुग्ध विकास मंत्री व दुग्ध विकास विभागाने शेतकऱ्यांच्या बाजूने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.